पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेत एकेकाळी काँग्रेसची एकहाती सत्ता होती, आता ती राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. येत्या महापालिका निवडणुकीत काँग्रेसचे गतवैभव पुन्हा मिळवण्याची भाषा पक्षात सुरू आहे. मात्र निवडून आलेले 14 नगरसेवक पक्षात थांबतील की नाही, अशी शंका घेण्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. एक-एक करत काँग्रेस नगरसेवकांनी सध्या बाहेरचा रस्ता धरला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 2012 च्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसतर्फे गौतम चाबुकस्वार, भाऊसाहेब भोईर, विनोद नढे, राहुल भोसले, जालिंदर शिंदे, गणेश लोंढे, कैलास कदम, सद्गुरु कदम, गीता मंचरकर, आरती चोंधे, सविता आसवानी, विमल काळे, शकुंतला बनसोडे, जयश्री गावडे हे 14 नगरसेवक निवडून आले होते. तथापि गेल्या काही दिवसांत या नगरसेवकांनी एक-एक करत काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्यास सुरूवात केली आहे. जेष्ठ नगरसेवक गौतम चाबुकस्वार यांनी सर्वप्रथम काँग्रेसला रामराम ठोकला. त्यानंतर पिंपळे निलखच्या नगरसेविका आरती चोंधे, पिंपरीतील नगरसेविका सविता आसवानी, चिंचवडच्या जयश्री गावडे यांनी भाजपाची वाट धरली असून, यासर्व नगरसेविकांच्या पतीने भाजपात प्रवेश केला आहे.
माजी शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर, महापालिकेतील विरोधी पक्षनेते राहुल भोसले, माजी विरोधी पक्षनेते विनोद नढे, नगरसेवक गणेश लोंढे व अन्य नगरसेवक राष्ट्रवादीच्या वाटेवर असून, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ते संपर्कात आहेत. खराळवाडीतील कदम बंधूंना भाजपा; तसेच राष्ट्रवादीकडून प्रवेशाचे प्रस्ताव आले आहेत. भोसरीतील नगरसेवक जालिंदर शिंदे यांनी आमदार महेश लांडगे यांचे नेतृत्व स्वीकारणार असण्याचे संकेत दिले आहेत. एकंदरीत काँग्रेसला लागलेली गळती ही पक्षश्रेष्ठींच्या दृष्टीने मोठी डोकेदुखी बनत चालली आहे.
काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे याबाबत म्हणाले की, काँग्रेसचे नगरसेवक पक्ष सोडणार, दुसरीकडे जाणार अशी नुसती चर्चा सुरू आहे. अद्यापही कोणत्याच नगरसेवकांनी पक्ष सोडला नाही, भविष्यातदेखील कोणीच कुठे जाणार नाही.