जानेवारीत निविदा
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी औरंगाबाद येथे या महामार्गाच्या कामाची काही महिन्यांपूर्वी घोषणा केली होती. तेव्हापासून सर्वेक्षणाचे व मान्यता देण्याचे काम सुरू होते. आता प्रकिया पूर्ण होऊन कामाची निविदा प्रकिया सुरू होईल. 17 जानेवारी 2017 रोजी निविदा घडण्यात येतील. प्रत्यक्षात कामाची सुरुवात फेब्रुवारी महिण्यात होईल.
औरंगाबाद : जळगाव-औरंगाबाद महामार्गासाठी केंद्राकडून एक हजार कोटींचा निधी मंजूर झाला आहे. फेब्रुवारीच्या शेवटी या महामार्गाचे काम प्रत्यक्षात सुरू होईल, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी दिली.
खड्ड्यांमुळे या महामार्गाची दुरवस्था झाली आहे. जगप्रसिध्द अजिंठा लेणी याच महामार्गावर असून औरंगाबाद व जळगाव या दोन जिल्ह्यांना जोडणारा हा महामार्ग सद्य:स्थितीत खड्ड्यांमुळे प्रवाशांना त्रासदायक ठरत आहे. महामार्गाच्या दुरुस्तीसाठी भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक व राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला. अजिंठा लेणी बघण्यासाठी आलेल्या पर्यटकांमुळे या रस्त्याची ओळख आता साता समुद्रापार गेली आहे. अजिंठा घाट, फर्दापूर ते औरंगाबाद जळगाव जिल्ह्यांच्या सीमेपर्यंत 10 किलोमीटरच्या अंतरात या महामार्गाची अक्षरश: चाळणी झाली आहे. यामुळे लहान मोठे अपघात सतत होत असतात. वाहतुकीची कोंडीही कायम होते. त्यामुळे या महामार्गाचे काम व्हावे, अशी मागणी खासदार दानवे यांनी केंद्रीय मंत्र्यांकडे केली होती.