पिंपरी : अन्न, वस्त्र आणि निवारा या मुलभूत गरजांबरोबरच शिक्षणही गरजेचे आहे. प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत असले पाहिजे. शिक्षण विकासाच्या संधीचा पासपोर्ट आहे, असे मत पुण्यातील विधी महाविद्यालयाचे प्रा. अॅड. नितीश नवसागरे यांनी केले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती वर्षानिमित्त आणि संविधान दिनानिमित्त पिंपरी, संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे सभागृहात दोन दिवसीय संविधान साहित्य संमेलनाचे आयोजन केले होते. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे शिक्षणाविषयक विचार आणि सद्यस्थिती’ या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी नगरसेवक अॅड. गोरक्ष लोखंडे, लेखक प्रभाकर ओव्हाळ, क्षेत्रिय अधिकारी अण्णा बोदडे आदी उपस्थित होते.
अॅड. नवसागरे म्हणाले की, महात्मा फुलेंनी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. तर, शाहू महाराजांनी बहुजन विद्यार्थ्यांना सज्ञान केले. शिक्षण घेतल्यावर जातीचे खूळ बाजूला पडेल हे शाहू महाराजांना माहित होते. आधुनिक क्रांतीचे शिक्षण महात्मा फुलेंनी दिले. सर्वोच्च ज्ञान गरिबांपर्यंत पोहोचले पाहिजे. प्रत्येक व्यक्तीने साक्षर झाले पाहिजे आणि शेवटपर्यंत शिकतच राहिले पाहिजे. शाहू महाराजांनी विद्यार्थ्यांना सर्वउपयोगी शिक्षण देण्याचा प्रयत्न केला.
शिक्षणात गोडवा निर्माण होत नाही. परिणामी, विद्यार्थी शिक्षणापासून बाहेर पडले जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण केली जावी. ज्ञान विचार करण्याची ताकद देते. कौशल्य प्रत्येकाकडे असते मात्र, कौशल्य आणि ज्ञान वेगळे आहे. समाज शिक्षण घेत नाही. तोपर्यंत लोकशाही पुढे जावू शकत नाही. शिक्षण धोरण ज्ञानावर आधारित असले पाहिजे. कौशल्यावर नाही असेही, नवसागरे म्हणाले. बाबासाहेबांचे शिक्षणाविषयक विचार आणि आजची शिक्षणाची पद्धत खूप बदललेली आहे. त्यामुळे आगामी काळात दर्जाहीन शिक्षण मिळण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली.