टाटा मोटर्स युनियनचा खुलासा
पिंपरी : सायरस मिस्त्री यांनी टी. सी. एस च्या भागधारकांना पाठवलेल्या पत्रात टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियन, पुणेबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे, असा आरोप टाटा मोटर्स युनियनने केला असून दिशाभूल करणाऱ्या माहितीचा युनियन खुलासा
देत आहे.
सायरस मिस्त्री यांनी भागधारकांना उद्देशून पाठवलेल्या पत्रात त्यांनी टाटा मोटर्स व्यवस्थापन आणि टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियन यांच्यात सुरू असलेल्या वेतन कराराच्या चर्चेचा संदर्भ दिलेला आहे. सदर कराराच्या चर्चेमध्ये टाटा मोटर्सच्या इतिहासात प्रथमच उत्पादकतेशी निगडीत वेतनवाढीबाबत चर्चा अंतिम टप्प्यात आली होती, असे त्यांनी नमूद केले आहे. त्यापुढे त्यांनी असा आरोप केला आहे. की, रतन टाटा यांनी युनियनच्या पदाधिका-यांना पाचारण करून टाटा यांना जाहीर पाठींबा द्यावा त्या बद्दल्यात उत्पादकतेशी निगडीत वेतनवाढीचा प्रस्ताव रद्द करू, असे सांगितले. त्यामुळे टाटा मोटर्सला काही महत्वाच्या सुधारणांचा लाभ होणार नाही, असे मिस्त्री यांनी आरोप केला आहे.
वास्तविक पाहता रतन टाटा यांचे नेतृत्व आसताना सन 2003, 2006, 2009 या तीन वेतन करारांमध्ये गुणवत्तेशी, उत्पादकतेशी, सुरक्षिततेशी आणि प्रॉफिटशी निगडीत वेतनवाढ कामगार संघटनेनी कंपनीच्या हितासाठी आणि उत्कर्षासाठी मान्य केली आहे. सन 2003 च्या वेतनकरारापासून युनियनने स्वीकारलेल्या वरील विविध योजनांमुळे कंपनीच्या कामगिरीत सन 2012 पर्यंत सातत्यपूर्ण सुधारणा झाली आहे, असे आवर्जून सांगावेसे वाटते.
रतन टाटा यांच्याशी युनियनची पूर्वनियोजित भेट होती. त्याची वेळ 10 नोव्हेंबर 2016 होती. त्या भेटीत टाटा यांनी सर्व युनियनला कंपनीच्या उच्च स्तरावरील घडामोडींकडे आपण लक्ष न देता कंपनीच्या हितासाठी काम करत राहण्याचा महत्वपूर्ण सल्ला दिला व त्यासंदर्भातील लेखी निवेदन सर्व कर्मचाऱ्यांना सुद्धा पाठविले आहे.
वरील व्यवस्थापनाने 15 दिवसांच्या कालावधीत सौहार्दपूर्ण वातावरणात वेतनकरार पूर्ण केला जाईल, असे युनियनला मौखिक आश्वासन दिले होते. परंतु प्रत्यक्षात 15 महिने झाल्यानंतरही वेतनकरारासंदर्भात अद्याप ठोस निर्णय झाला नाही. सायरस मिस्त्रींच्या अशा प्रकारच्या जाणीवपूर्वक दिशाभूल करण्याच्या वृत्तीमुळे युनियनचा त्यांच्यावरील विश्वास पूर्णपणे उडाला आहे.
भारतीय उद्योग क्षेत्रात मिस्त्रींसारख्या व्यक्तिमत्वाने कामगार युनियनबद्दल, असे अपरिक्व वक्तव्य केले याचा युनियनला जबर धक्का बसला आहे. कोणत्याही कंपनीला यशस्वी होण्यासाठी कठीण परिश्रम आणि सुयोग्य संतुलनाची नितांत गरज असते तेव्हा, व्यावस्थापन आणि कामगार या दोन विरूद्ध बाजू नसून एका सुयोग्य संतुलित समीकरणाच्या दोन बाजू आहेत यावर टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियनचा ठाम विश्वास आहे. यापुढेही टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियन आणि सर्व कामगार रतन टाटा साहेबांना जाहीर पाठींबा देत आहोत.