पिंपरी : महापौर या खूपच सहनशील असून त्यांनी राजकीय वादाच्या काळातही महापालिका सभा, त्यांचे पद चांगल्या प्रकारे सांभाळले, अशा शब्दात अखेरच्या व विशेष महापालिका सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी महापौर शकुंतला धराडे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.
पिंपरी-चिंचवड महापालिकेची फेब्रुवारी महिन्यात सार्वत्रिक निवडणूक होत आहे. त्यासाठी आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी महापालिकेची विशेष आणि प्रशासकीय निर्णयाची शेवटची सर्वसाधारण सभा खेळी-मेळीच्या वातावरणात झाली. या सभेला बोटावर मोजण्या इतकेच नगरसेवक उपस्थित होते. सर्वांनी आपल्या पाच वर्षाच्या कार्यकाळातील चांगल्या वाईट अनुभवाचे कथन केले.
या वेळी शिवसेनेच्या गटनेत्या सुलभा उबाळे म्हणाल्या की, महापौर धराडे यांनी अडीच वर्षांत चांगले काम केले आहे. या काळात त्यांनी विविध संकटांचा सामना केला असला तरी माजी क्रिकेट पटू व भारतरत्न सचिन तेंडूलकर सारखी जोरदार बॅटिंग केल्याचे गौरवउद्गार काढले. काही चुका झाल्या असतील, महापौरांनी, पक्षनेत्यांनी वेळो-वेळी सहकार्य केल्याची भावना नगरसेविका अमिना पानसरे यांनी व्यक्त केली.
सर्वप्रथमच नगरसेवक झाले होते, सुरुवातीला काही कळत नव्हते. परंतु, इतर महिला नगरसेविकांनी, अधिकाऱ्यांनी चांगले सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे आभार सुमन नेटके यांनी मानले. उल्हास शेट्टी म्हणाले की, सर्व सदस्यांनी चांगले काम केले. यापुढील सभागृहात येईल की नाही, माहित नाही. परंतु, जनतेने येत्या महापालिका निवडणुकीत चांगले काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना निवडून द्यावे. चारचा प्रभाग झाल्याने सर्व सदस्यांपुढे निवडून येण्याचे आव्हान असल्याचे ते म्हणाले.
धनंजय आल्हाट यांनी महापौर धराडे या यशस्वी महापौर आहेत. तुम्ही आमदार व्हावे, ही आमची इच्छा आहे. यासाठी त्यांनी महापौरांना शुभेच्छा दिल्या. राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नगरसेविका शमीम पठाण यांनीही महापौरांचे कौतुक केले. त्या म्हणाल्या की, गेल्या अडीच वर्षांत सभागृहात आरोप-प्रत्यारोप झाले. ते तेवढ्यापुरतेच ठेवून सर्वांनी नवीन जोमाने कामाला लागावे. महापौरांनी खूपच चांगले काम केले. शहराच्या विकास कामात अधिका-यांसह महापालिकेच्या सर्वच कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान आहे, असे पठाण शेवटी म्हणाल्या. सर्व सदस्यांचे आभार मानताना महापौर शकुंतला धराडे म्हणाल्या की, सुरुवातीला महापौर पदासाठी मी घाबरत होते. परंतु, नेत्यांचा विश्वास सार्थ ठरविला. दिलेली जबाबदारी व्यवस्थित पार पाडली. या अडीच वर्षाच्या महापौर पदाच्या कार्यकाळात खूप काही कामे केली. नेहमीच चांगल्या कामांना प्राधान्य दिले. ‘कर नाही त्याला डर कशाला’ याप्रमाणे काम केले. यापुढेही आपली स्पष्ट भूमिका कायम असणार असल्याचे सांगून त्यांनी सर्वांचे आभार मानले.