पिंपरी (दि. 09 जानेवारी 2017) संभाजी ब्रिगेड पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रिंगणात उतरणार आहे. शहरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा ‘अजेंडा’ घेऊन संभाजी ब्रिगेड येणारी महापालिका निवडणूक लढवणार आहे. आमच्या विचारांचे लोकप्रतिनिधी सभागृहात आहेत, मात्र त्यांना सभागृहात संभाजी ब्रिगेड काम करत असलेल्या प्रश्नांवर आवाज उठवता आला नाही. त्यामुळे आतापर्यंत झेंडा त्यांचा अन् दांडा आमचा असं असायचं, पण आता ‘झेंडा, दांडा आणि अजेंडा’ हि आमचा राबवून व्यवस्था परिवर्तन करण्यासाठी संभाजी ब्रिगेड राजकारणात उतरणार असल्याचे प्रतिपादन प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी केले.
पिंपरीमध्ये रविवारी (दि. 8 जानेवारी) झालेल्या पत्रकार परिषदेत आखरे बोलत होते. या वेळी पुणे जिल्हाध्यक्ष अभिमन्यू पवार, उपाध्यक्ष सुनिल साळुंके, प्रवीण कदम, डॉ. सुहास जगदाळे उपस्थित होते.
आखरे म्हणाले की, वैचारिक लढाईबरोबर प्रबोधनाची चळवळ राबवूनही व्यवस्था परिवर्तनात बदल झालेला नाही. त्यामुळे संभाजी ब्रिगेड शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी, कामगार यांच्या न्याय हक्कांसाठी राजकारणात उतरणार आहे. चालू वर्षी 18 महानगरपालिका, सर्वच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीत उमेदवार उतरवणार आहे. ग्रामीण भागात ‘शेत मालाला भाव व दारु मुक्त गाव’ यासह जनहिताचे विषय घेऊन निवडणूकीला सामोरे जावू. पुढील काळात संभाजी ब्रिगेड आक्रमक बाणा सोडणार नाही. संभाजी ब्रिगेड शंभर टक्के राजकारण आणि समाजकारण करणार आहे. संभाजी ब्रिगेड निवडणूकीत ‘मनी मसल पॉवर’ पेक्षा वैचारिक उमेदवारांना निवडणूकीत उतरविणार आहे, असे आखरे यांनी सांगितले. अभिमन्यु पवार म्हणाले की, राजकारणी केवळ शाहू, फुले, आंबेडकर या महापुरुषांची नावे घेतात, पण त्यांचे विचार आचरणात आणून कृतीत कधी उतरवित नाहीत. संभाजी ब्रिगेडला युवक, महिलांचा पाठिंबा असल्याने निवडणूकीत निश्चित यश मिळेल असा दावा पवार यांनी केला.