धुळे : येथील जामफळ धरण तापी नदीतून भरावे यासाठी गाव एकवटला असून तापी – जामफळ – कनोली योजनेला त्वरीत निधी मिळून कामास सुरुवात व्हावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा येथील तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष युवानेते राजेंद्र झेंडू महाजन यांनी दिला आहे. यासाठी जामफळ धरण संघर्ष समिती स्थापन करण्यात येत आहे.
तापी नदीतून तापी – जामफळ – कनोली प्रकल्पावर सध्या राजकारण जोरात आहे. संरक्षण राज्यमंत्री डॉ. भामरे सह भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रकल्पामुळे स्थानिक लोकांचा व परिसराचा कसा विकास होईल याची आकडेवारीसह माहिती देत आहेत.
दरम्यान जामफळ धरणाची उंची वाढवावी, त्यातील गाळ काढावा या ग्रामस्थांच्या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे. यापार्श्वभुमीवर येथे व परिसरात लागोपाठ दोन पावसाळ्यात पाऊस न झाल्याने जामफळ धरणाला डबक्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. जिल्ह्याला प्रथमच एक केंद्रात व एक राज्यात मंत्री मिळाला आहे. जलसंपदामंत्री गिरीश महाजन खानदेशातील आहेत. जामफळ धरणाची उंची वाढवून तो तापी नदीतून भरणे व तेथून मालेगाव तालुक्यातील कनोली धरण भरणे असा हा प्रकल्प असून त्याला मंजुरी मिळाली आहे.
निधी देखील मंजूर झाला आहे. मात्र जिल्ह्याला प्रथमच एक केंद्रात व एक राज्यात मंत्री मिळाला असूनही तसेच जलसंपदामंत्री गिरीश महाजन खानदेशातील असूनही कामास सुरुवात नाही. परिणामी सोनगीरसह दहा गावांना फेब्रुवारी पासुन तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार आहे.
जामफळ भरण्याची शक्यता लाल फितीच्या कारभारात अडकली आहे. धरणातच (बुडीत क्षेत्र) प्रथमच एका शेतकर्याने फळबाग लावली आहे. मात्र ते त्याचे खाजगी क्षेत्र असल्याचे सांगितले जाते.
तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष राजेंद्र महाजन, माजी उपसरपंच प्रकाश गुजर, माजी पंचायत समिती सदस्य अविनाश महाजन, माजी ग्रामपंचायत सदस्य हसनखान पठाण, प्रमोद धनगर, एल. बी. चौधरी, आरिफ पठाण, विशाल कासार, सतीश भावसार, जितेंद्र बागूल, विशाल भारती यांचेसह अनेक ग्रामस्थ संघर्ष समितीत इच्छुक असून धरणाचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत लढा सुरू राहील असा इशारा दिला आहे. लवकरच गिरीश महाजन यांची भेट घेतली जाणार आहे.