पिंपरी : देशावर अनेक हल्ले होत आहेत, परंतु सीमेवर लढणाऱ्या सैनिकांमुळेच आपण सुरक्षित आहोत. याचे संपूर्ण श्रेय सैनिकांनाच जाणे महत्त्वाचे आहे. मात्र आज या सैनिकांचे श्रेय राज्यकर्ते घेतात की काय अशी भीती व्यक्त होत असल्याचे मत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले.
भोसरी, इंद्रायणीनगर येथे राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित व्याख्यानमाला कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी शहीद मेजर कुणाल मुन्नागीर गोसावी यांच्या मातोश्री वृंदा मुन्नागीर गोसावी यांना राजमाता जिजाऊ पुरस्कार धनंजय मुंडे यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.
धनंजय मुंडे म्हणाले, आज राजमाता जिजाऊंचा जन्मदिवस आहे, आणि याच दिवशी ज्या वीराने देशासाठी बलिदान दिले अशा वीरमातेचा सन्मान माझ्या हस्ते करण्यात येत आहे. हे माझे भाग्यच समजतो. देशाचे संरक्षण करताना आपलेच भाऊ शहीद होतात, त्यांच्या वीरमातांना देखील जिजाऊंचीच उपमा दिली पाहिजे, असे मत धंनजय मुंडे यांनी व्यक्त केले.
आज देशावर अनेक हल्ले होत आहेत. मात्र सीमेवर लढणाऱ्या वीर जवानांमुळेच आपण आज सुरक्षित आहोत. याचे संपूर्ण श्रेय सैनिकांनाच गेले पाहिजे. मात्र अलिकडे हे श्रेय राज्यकर्ते घेतात की काय अशी भीती व्यक्त होत असल्याचे ते म्हणाले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विलास लांडे यांनी केले तर आभार निवृत्ती शिंदे यांनी मानले.
यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी आमदार विलास लांडे, नगरसेवक अजित गव्हाणे, संजय वाबळे, विश्वनाथ लांडे, शिक्षण मंडळाचे सभापती निवृत्ती शिंदे, माजी उपमहापौर शरद बोऱ्हाडे, युवानेते विक्रांत लांडे, सुधीर मुंगसे आदी उपस्थित होते.