पिंपरी – “जाती, रूढी, परंपराचे पगडे आजही समाजात मोठ्या प्रमाणात दिसतात यांना आपण उलट प्रश्न विचारू शकत नाही. विवेक वाहिनी आपल्याला प्रश्न विचारायला प्रवृत्त करते. सत्य असत्याच्या मध्ये फरक करणारी बुद्धी म्हणजे विवेक. अंधश्रद्धा हा समाजाला लागलेला कलंक आहे. विवेकाच्या माध्यमातून त्याचे उच्चाटन करता येऊ शकते ” असे प्रतिपादन डॉ. हमीद दाभोळकर यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालयात ‘विवेक वाहिनी’ व कॉलेज इंडस्ट्री को-ऑर्डिंनेशन कमिटी उद्घाटन प्रसंगी डॉ. हमीद दाभोळकर प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड म्हणाले की, “विवेकला जागरूक ठेवल्याने जीवनाला अर्थ प्राप्त होतो. जात, अंधश्रद्धा व व्यसन या माणसांच्या प्रगतीच्या शत्रू आहेत, विवेकाने त्यांच्यावर मात करता येते.” यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते मिलिंद देशमुख यांनी विचार व्यक्त केले. कला शाखेच्या उपप्राचार्या प्रा. मृणालिनी शेखर, वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य डॉ. प्रमोद बोत्रे कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. एकनाथ कळमकर तसेच बहुसंख्येने प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विवेक वाहिनी समितीचे प्रमुख डॉ. मल्हारी रास्ते यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. प्रतिमा कदम व डॉ. सोनल बावकर यांनी केले. तर आभार डॉ. संजय मेस्त्री यांनी मानले.