साक्री – येथील प्रचिती इंटरनॅशनल स्कूल व जूनियर कॉलेज तर्फे दिपावली सण उत्साहात साजरा करण्यात आला. केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डच्या निर्देशित केलेल्या अभ्यासक्रमानुसार विद्यार्थ्यांमध्ये विविध जीवन-कौशल्य विकसित व्हावे, म्हणून दैनंदिन जीवनात असलेल्या विविध सणांचे महत्व पटवून देतांना दीपावली हा सण पार पडला. या कार्यक्रमानिमीत्त आर्थिक दुर्बल घटकातील मुला-मुलींना सणाचे औचित्य साधून संस्थेचे चेअरमन प्रशांत पाटील यांच्या मार्फत कपडे व फराळ वाटप करण्यात आले.
दिवाळी हा सण किमान तीन हजार वर्षे जुना आहे. या सणाचा उगम फार प्राचीन काळी आर्यांचे वास्तव्य उत्तर ध्रुव प्रदेशात होते, त्या काळातच झाला असा समज आहे. सहा महिन्यांची प्रदीर्घ रात्र संपून सहा महिन्यांचा दिवस सुरु होताच. त्या प्रदेशातील लोकांना नवजीवन प्राप्त झाल्यासारखे वाटत असावे आणि त्यासाठीच ते हा आनंदोत्सव करीत असावेत. तथापि वैदिक काळात आश्विन महिन्यात शरद ऋतूचे औचित्य साधून आश्वयुजी किंवा आग्रयण यासारखे यज्ञ केले जात असत ज्यांचा समावेश सात पाकयज्ञ यामध्ये होतो, असे मत संस्थेचे चेअरमन प्रशांत पाटील यांनी विद्यार्थ्यंना सणाचे महत्व पटवून देतांना व्यक्त केले.
प्रसंगी शाळेच्या प्रांगणात वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज या दीपावली सणाच्या पाचही दिवसांचे महत्व मांडण्यासाठी शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध पथनाट्य सादर केली. यावेळी शाळेचे प्राचार्य अतुल देव, प्राचार्या भारती पंजाबी, संस्थेचे समन्वयक तुषार देवरे, वैभव सोनवणे यासह सर्व शिक्षक उपस्थित होते.
यावेळी प्राचार्य अतुल देव यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करतांना सांगितले की, प्रचिती इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेजमार्फत वर्षभरात विविध उपक्रम राबविले जातात. विद्यार्थ्यांमध्ये नवनवीन जीवन कौशल्य विकसित करण्यासाठी प्रयत्न केले जाते. दीपावली साजरी करतांना आपण फक्त दीपावली म्हणजे सुट्टी असा आशय गृहीत न धरता या सणाचे पाचही दिवसांचे आपल्या जीवनातील असलेले अनन्य साधारण असे महत्व पटवून त्या विशिष्ट दिवसांचे साजरा करण्याची श्राषोक्त पद्धती या बाबत माहिती दिली.
दरम्यान, साक्री शहर पंचक्रोशीतील भिल्ल वस्ती तसेच कोकले भिल्ल परिसरात आर्थिक दुर्बल घटक वसलेल्या परिसरात यावेळी कपडे व फराळ वाटप करण्यात आले. या उपक्रमाबद्दल परिसरातील लोकांनी समाधान व्यक्त केले. या कार्यक्रमाचे नियोजन शीतल सोनवणे तर छायाचित्रण नितीन राजपूत यांनी केले. या कार्यक्रमासाठी सुबक रांगोळी काढण्यात आली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन स्मिता नेरकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.