पिंपरी चिंचवड – पत्नी तिच्या बहिणीच्या नियोजित पतीबरोबर फोनवर वारंवार बोलत होती. ही बाब पतीला खटकल्याने पतीने पत्नीला मारहाण केली. या रागातून पत्नीने चिट्ठी लिहून पोटच्या दोन चिमुकल्यांसमोर गळफास घेऊन आत्महत्या केली. पतीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे पत्नीने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे. हा प्रकार सांगवी येथे घडला.
रश्मीता राजेंद्र दास (वय 26) असे आत्महत्या केलेल्या पत्नीचे नाव आहे. याप्रकरणी तिचा भाऊ राजेश कुमार दास यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती राजेंद्र चंद्रमणी दास (वय 37) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक अजय भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत रश्मीता हिच्या बहिणीचे लग्न ठरले आहे. बहिणीच्या नियोजित पतीसोबत रश्मीता फोनवर बोलत होती. फोनवर बोलल्याची बाब पती राजेंद्र दास याला खटकली. त्यावरून राजेंद्र आणि रश्मीता यांचे कडाक्याचे भांडण झाले. राजेंद्र यांनी रश्मीताला मारहाण केली. या रागातून रश्मीताने आत्महत्येचे पाऊल उचलले.
राजेंद्र आणि रश्मीता यांना सहा वर्षांची एक मुलगी आणि दहा महिन्यांचा एक मुलगा आहे. त्या दोघांसमोर रश्मीता हिने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी रश्मीताने चिठ्ठी लिहून ठेवली आहे. त्यात ती ‘पतीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे. आपल्या सहा वर्षाच्या मुलीला लहान बाळाचा सांभाळ करण्याच्या सल्ला रश्मीताने दिला. आईची माया समजण्यापूर्वीच रश्मीताने चिमुकल्यांसमोर आत्महत्या केली आहे. ऐन दिवाळीत ही धक्कादायक घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.