पिंपरी | पवना धरणात मुबलक पाणी असताना शहरात आजही टंचाई आहे. शहराच्या विविध भागातून असंख्य तक्रारी असताना पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासन यावर तोडगा काढत नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांना मुबलक पाणी पुरवठा करा, अशी मागणी महापालिकेतील मनसेचे गटनेते सचिन चिखले यांनी केली आहे.
यासंदर्भात चिखले यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे तक्रार केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहर व मावळमधील नागरिकांची तहान भागविणारे पवना धरण नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये 100 टक्के भरले. मागील वर्षी आजमितीला धरणात 88 टक्के पाणीसाठी होता. मागील वेळेपेक्षा यावेळी धरणात 11.50 टक्के पाणीसाठा अधिक आहे.
शहरातील ज्येष्ठ नागरिक महिला वर्ग यांना अजून देखील पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. शहरातील काही ठिकाणी पाण्याच्या तक्रारी आहे. महापालिका प्रशासनाप्रती नागरिकांची नैराश्याची भावना आहे. काही ठिकाणी पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. तर, काही ठिकाणी पाण्याचे टँकर अध्याप देखील सुरू आहेत. त्यामुळे या सर्व बाबींचा विचार करून त्वरित शहरावरील पाणीकपात रद्द करून शहरवासीयांना सुरळीत नियोजित व मुबलक पाणीपुरवठा करावा, अशी मागणी मनसे गटनेते सचिन चिखले यांनी केली आहे. यावेळी सचिन चिखले यांच्यासह रुपेश पटेकर, सिमा बेलापुरकर, रवी जाधव, स्वप्निल महांगरे, मनोज लांडगे, रोहित काळभोर, प्रतिक शिंदे, गणेश उज्जेन्नकर आदी यावेळी उपस्थित होते.