पिंपरी चिंचवड – पिंपरी-चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणा-या पवना धरण शंभर टक्के भरले आहे. महापालिका उचलत असलेल्या 520 एमएलडीपैकी 200 एमएलडी पाण्याची गळती होत आहे. नियोजन शून्य कारभार आणि अकार्यक्षम आयुक्तांमुळेच पाण्याची कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याचा आरोप शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केला.
शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्या संदर्भात खासदार बारणे यांनी आज (शुक्रवारी) आयुक्त श्रावण हर्डीकर यांची भेट घेतली. शिष्टमंडळात शहरप्रमुख योगेश बाबर, नगरसेवक प्रमोद कुटे, सचिन भोसले, नगरसेविका अश्विनी चिंचवडे, रेखा दर्शिले, चिंचवड महिला आघाडीच्या संघटिका अनिता तुतारे यांचा समावेश होता.
खासदार बारणे म्हणाले, शहराला पुरेसे आणि समान पाणीपुरवठा होत नाही. तोपर्यंत महापालिकेने अल्प दरात टँकरने पाणीपुरवठा करावा. विहिरी, बोअरवेल हे पाण्याचे स्त्रोत ताब्यात घ्यावेत. नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यात यावे. संपुर्ण शहराला समान पाणीपुरवठा करण्यात यावा.
महापालिका प्रशासन पाणी गळती, चोरी रोखू शकले नाही. पाणी चोरी शोधण्याचे काम कोणाचे आहे. महापालिका कोट्यवधी रुपयांचे नुकसान करत आहे. अनधिकृत नळजोड एका दिवसात झाले नाहीत. ते रोखण्याचे काम प्रशासनाचे होते. परंतु, त्याकडे दुर्लक्ष केले. जेएनयूआरएन, अमृत योजनेअंतर्गत सातत्याने पाण्याचे मीटर बदलले. परंतु, पाणीगळती रोखू शकले नाहीत. ठेकेदार पोसण्यासाठीच हे केले जात आहे का? याचा संशय येत आहे. पाणीप्रश्न सोडविण्यात प्रशासन निष्क्रिय ठरले आहे. आयुक्तांचा वचक राहिल नाही. तक्रारींना केराची टोपली दाखविली जात आहे. आजपर्यंतच्या पाणीपुरवठ्याच्या निविदांची चौकशी करावी. दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली.