मुंबई – ‘महाराष्ट्रातली राष्ट्रपती राजवट संपुष्टात आणण्यासाठी दिल्लीत पहाटे केंद्रीय मंत्रीमंडळाची बैठक घेतल्याचं मला कळलं. जणूकाही पाकिस्तानवर जसा सर्जिकल स्ट्राईक झाला, तसा महाराष्ट्रावर हा फर्जिकल स्ट्राईक झाला आहे. देशात हा रात्रीस खेळ चालेचा भाग सुरू आहे’, असं उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच, ‘भाजप ३० तारखेला बहुमत सिद्ध करू शकणार नाही, त्यानंतर आम्ही सत्तास्थापना करू’, या शरद पवारांनी याच पत्रकार परिषदेमध्ये मांडलेल्या भूमिकेशी देखील सहमत असल्याचं उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितलं. राज्यातल्या जनतेला आणि सर्वच विरोधी राजकीय पक्षांना धक्का देत शनिवारी भल्या सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिंमडळ पक्षनेते अजित पवार यांनी देखील उपमुख्यंमत्रीपदाची शपथ घेतली आणि सगळ्यांनाच धक्का बसला. शिवसेनेला हा सगळ्यात मोठा धक्का होता. मात्र, यावर उद्धव ठाकरेंनी शनिवारी दुपारी शरद पवारांसोबत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये पक्षाची भूमिका मांडली आहे.
‘मी पुन्हा येईनपेक्षा मी जाणारच नाही म्हणतात…!’
‘देशात लोकशाहीचा खेळ चालू आहे. मधल्या काळात इव्हीएमवर आरोप केला जात होता. तो कमी म्हणून हा सगळा खेळखंडोबा केला जात आहे. मी पुन्हा येईन पेक्षा मी जाणारच नाही असं म्हणत फेव्हिकॉल लावून काही माणसं बसली आहेत. आमच्यावर जनादेशाचा अपमान केल्याचा आरोप केला. पण आमचं सगळं उघड असतं. आमचं राजकारण रात्रीस खेळ चाले नसतो. आम्ही सगळं उघड करतो. तुम्ही फोडून राजकारण करता. हरियाणामध्ये झालं तो जनादेशाचा आदर होता का? आम्हाला विरोधी पक्ष नको, मित्रपक्ष नको, स्वत:च्या पक्षातले प्रतिस्पर्धी देखील नको. फक्त मीपणा आहे. कुणी पाठीत वार करण्याचा प्रयत्न करू नये. रात्रीत गुफ्तगू करून सत्ता मिळत नाही. राज्यपाल महोदय किंवा राष्ट्रपती राजवट काढण्यासाठी पहाटे मंत्रिमंडळाची बैठक झाली. पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक करावा, तसा हा फर्जिकल स्ट्राईक महाराष्ट्रावर झाला आहे.
‘आमदार फोडण्याचा प्रयत्न तर करून बघा!’
दरम्यान, यावेळी पत्रकारांनी उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे आमदार देखील फोडण्याचा प्रयत्न होऊ शकतो का? असा प्रश्न विचारला. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी थेट भाजपला आव्हान दिलं. ‘भाजपनं शिवसेनेचे आमदार फोडण्याचा प्रयत्न कर करून बघावा’, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.