मुंबई – विधीमंडळ पक्षनेतेपदावरुन अजित पवार यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे हा निर्णय घेण्यात आला आहे. आज सकाळीच देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातला सर्वात मोठा ट्विस्ट पाहण्यास मिळाला. महाविकास आघाडीच्या बैठकीत काल रात्री उद्धव ठाकरेंच्या नावाला मुख्यमंत्री म्हणून पसंती मिळाली होती. हा प्रस्ताव उद्धव ठाकरेंनी स्वीकारल्याचंही संजय राऊत यांनी म्हटलं होतं. मात्र आज सकाळी ८ च्या सुमारास राजभवनात शपथविधी पार पडला.
मात्र अजित पवार यांनी घेतलेला निर्णय पक्षाचा नाही असं शरद पवार यांनी ट्विट करुन स्पष्ट केलं. त्यामुळे अजित पवारांना मानणारा गट भाजपासोबत गेल्याची चर्चा आहे. नेमकं काय घडलं आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र विधीमंडळ पक्षनेतेपदावरुन अजित पवार यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.
गेल्या जवळपास २९ ते ३० दिवसांपासून महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा पेच सुटत नव्हता. महायुतीला बहुमत मिळालेलं होतं. मात्र शिवसेनेने पहिल्याच दिवशी आमच्यापुढे सगळे पर्याय खुले आहेत असं जाहीर केलं. तसंच अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घ्यावं असंही त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर भाजपाने असं काहीही ठरलं नव्हतं असं म्हटलं होतं. त्यानंतर युती तुटली, शिवसेनेला एनडीएतून बाहेर काढण्यात आलं. शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्यास संमती दर्शवली. महाविकास आघाडी स्थापन झाली. त्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री व्हावं म्हणून आग्रह झाला, तसा प्रस्तावही मांडण्यात आला. असं सगळं असताना आज महाराष्ट्रातल्या राजकारणातला सर्वात मोठा ट्विस्ट पाहण्यास मिळाला. यानंतर अजित पवार यांची विधीमंडळ पक्षनेते पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे.