महाजन आयोगाने सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्र व कर्नाटकला कोणता भाग देण्यात आला आहे, हे स्पष्ट झाले आहे. अशाप्रकारचे वाद निर्माण करने योग्य नाही. आम्ही एक इंचही जमीन देणार नाही, असे कर्नाटकाचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी सांगितले आहे.
महाराष्ट्र – कर्नाटक सीमावादामुळे तणाव वाढत असल्याने महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ आणि कर्नाटक परिवहन मंडळाने आपापली प्रवासी वाहतूक सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. बेळगावमध्ये शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केल्यामुळे संतप्त शिवसैनिकांनी रविवारी कोल्हापुरात कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळला होता. शिवाय एका चित्रपटगृहातील कानडी चित्रपटाचा खेळही बंद पाडला होता.
कर्नाटक नवनिर्माण सेनेचा स्वयंघोषित नेता भीमाशंकर पाटील याने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर कोल्हापुरात शिवसेना आक्रमक झाली होती. कोल्हापुरात शिवसेनेने पाटील याची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढली होती. याचे पडसाद कर्नाटकात उमटले व कर्नाटक नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या पुतळ्याचे दहन केले. त्याला प्रत्युत्तर म्हणून रविवारी कोल्हापुरात शिवसेनेने निषेध मोर्चा काढत कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांच्या पुतळ्याचे बसस्थानक परिसरात दहन केले होते.शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने, माजी आमदार सत्यजित पाटील, तसेच संजय पवार, विजय देवणे, मुरलीधर जाधव हे तिन्ही जिल्हा प्रमुख यावेळी उपस्थित होते.
अन्याय होऊ देणार नाही – फडणवीस
बेळगावमधील मराठी माणूस हा महाराष्ट्रातील मराठी माणसांबरोबरच राहील. बेळगावमधील मराठी माणसांवर अन्याय होऊ देणार, नाही, अशी ग्वाही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सीमाप्रश्न प्रकरणी आंदोलनांवर दिली आहे.