नवी दिल्ली – देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने एटीएममधून रोख रक्कम काढण्याच्या प्रक्रियेत एक महत्त्वाचा बदल केला आहे. बँक ‘वन-टाइम पासवर्ड'(OTP) आधारित रोख रक्कम काढण्याची प्रणाली अंमलात आणणार आहे. उद्यापासून अर्थात 1 जानेवारी 2020 पासून ही नवीन प्रणाली अंमलात येईल.
एटीएममधील अनधिकृत व्यवहारास प्रतिबंध घालण्यासाठी बँक वन-टाइम पासवर्ड आधारित रोख रक्कम काढण्याची प्रणाली आणत आहे. ओटीपी प्रणालीअंतर्गत रात्री 8 वाजल्यापासून ते सकाळी 8 वाजेपर्यंत एटीएममधून पैसे काढताना तुम्हाला बँकेकडे असणाऱ्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर ओटीपी पाठवला जाईल. हा नियम 10 हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या व्यवहारांना लागू असेल. एसबीआयने ट्विटरद्वारे ही माहिती दिलीये. यामुळे अवैध व्यवहार रोखू शकतील असे बँकेचे म्हणणे आहे.