पिंपरी :- पिंपरी चिंचवड शहरातील कविंना स्वत:चे, हक्काचे व मानाचे व्यासपीठ मिळावे व त्यांच्या प्रतिभेला वाव मिळावा, या उद्देशाने कवि संमेलनाचे आयोजन करण्यात आले असल्याचे प्रतिपादन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडानिमित्त महात्मा फुले महाविद्यालय, पिंपरी येथे कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते त्याचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी नगरसदस्या निकीता कदम – जगताप, प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, जनसंपर्क अधिकारी रमेश भोसले उपस्थित होते. आयोजित कविसंमेलनामध्ये ज्येष्ठ कवी राजन लाखे, राज आहेरराव, अनिल दिक्षित, नंदकुमार मुरडे, पुरुषोत्तम सदाफुले, दिनेश भोसले, सुनिल भिसे, किशोर केदारी, रघुनाथ पाटील, प्रा. धनंजय भिसे, पितांबर लोहार, प्रदिप गांधलीकर, सिध्दार्थ भोसले, निलेश म्हसाये, सुहास घुमरे, दत्तु ठोकळे, वर्षा बालगोपाल, सविता इंगळे, शोभा जोशी, जयश्री श्रिखंडे, सचिन वानरे, विशाल कांबळे, अवधुत कुलकर्णी, गणेश सांनपारखे, तेजश्री नांगराळे, ऐश्वर्या जोशी, नानासाहेब मांगले, शुभम बारोठ आदी कवींनी सहभाग घेतला होता. या कविसंमेलनामध्ये शहरातील मान्यवर कविंसह नवोदित कविंनीही हास्य, प्रेम, विरह, प्रबोधन, विद्रोह अशा विविध स्वरुपांच्या कविता सादर करुन संमेलनात बहार आणली. महापौर उषा उर्फ माई ढोरे म्हणाल्या, प्रत्येकाच्या अंगी उपजत एक गुण असतो त्या गुणाचा विकास करण्यासाठी त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळत नाही. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने त्यांना नियमित व्यासपीठ उपलब्ध करुन दिले जाईल. त्याचा सर्व कवि, साहित्यिक, कलाकार यांनी आपल्या अंगी असलेली कला सादर करण्यासाठी उपयोग उपयोग करावा, असेही त्या यावेळी म्हणाल्या. यावेळी प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड म्हणाले, समृध्द परंपरा असलेल्या मराठी भाषेतील संत – पंथ – तंत काव्याने मराठी समाजाला जगण्याचे बळ आणि प्रेरणा दिली. अशा स्वरुपाचे कविसंमेलने माणसाला जगण्याची खेळाडूवृत्ती शिकवतात. मनोरंजनासोबत प्रबोधनाची परंपरा मराठी कवितेने जोपासली आहे. या कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या मनावर उत्तम संस्कार होतात, असेही ते यावेळी म्हणाले. कवि संमेलनाचे प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांनी केले. सूत्रसंचालन कवि किशोर केदारी व निलेश म्हसाये यांनी केले. तर आभार जनसंपर्क अधिकारी रमेश भोसले यांनी मानले.