Chaupher News
मुंबई : राज्यात संरपंचांची निवड आता ग्रामपंचायत सदस्यांमधूनच होणार आहे. या संदर्भात विधानसभेत भाजप आमदारांच्या प्रचंड गदारोळातच आवाजी मतदानाने हे विधेयक मंजूर करण्यात आलं. त्यामुळे थेट जनतेतून सरपंच निवड करण्याचा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला निर्णय रद्दबातल होणार आहे. आता ज्या ग्रामपंचायत निवडणूक होणार आहेत, तिथेही ग्रामपंचायत सदस्यांमधूनच संरपच निवडला जाईल, अशी माहिती ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
सरपंच समितीच्या आग्रहाखातर आमचं सरकार असताना हा निर्णय घेतला होता. गावागावातील सरपंचांची ही मागणी होती. आपले सरपंच थेट निवडून येऊ शकत नाहीत, हे माहीत असल्यानेच महाविकास आघाडीने हे विधेयक मंजूर करुन घेतलं आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तर ग्रामपंचायती संदर्भात थेट निवडणूक हे विधेयक कामकाज पत्रिकेत नसताना अध्यक्षांनी हे विधेयक आणले. विरोधीपक्षाची मुस्कटदाबी सरकार करताना पाहायला मिळत आहे, अशी टीका विधानपरिषद विरोध पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली.
ग्रामपंचायत सदस्यांमधूनच सरपंचांची निवड केली जावी, हा महाविकास आघाडी सरकारचा अध्यादेश राज्यपालांनी फेटाळून लावला होता. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात सरकारने थेट जनतेतून सरपंच निवड करण्याचा निर्णय घेतला होता. तो निर्णय रद्द करत जुन्याच पद्धतीनुसार, म्हणजे ग्रामपंचायत सदस्यांमधूनच सरपंचाची निवड करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला. तसा अध्यादेशही सरकारनं काढला मात्र त्यावर स्वाक्षरी करण्यास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नकार दिला होता. त्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी सरपंचाची निवड ग्रामपंचायत सदस्यांमधून करण्याचं विधेयक सभागृहात आवाजी बहुमताने मंजूर करण्यात आलं. आता हे विधेयक मंजुरीसाठी राज्यपालांकडे पाठवण्यात येणार आहे.