Chaupher News
दिल्ली : उत्तरपूर्व दिल्लीतील शिव विहार परिसरात शुक्रवारी एका ६० वर्षीय व्यापाऱ्याचा मारहाणीदरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर दिल्ली हिंसाचारातील मृतांचा आकडा ४२ वर पोहोचला आहे. तर हिंसाचार प्रकरणी आतापर्यंत ६३० जणांना अटक करण्यात आली आहे.
ईशान्य दिल्लीत शुक्रवारी पोलिसांनी शांतता प्रस्थापित केली असली तरी तणाव कायम आहे. आत्तापर्यंत दंगलखोरांविरोधात १२३ गुन्हे दाखल करण्यात आले असून ६३० संशयितांना अटक करण्यात आल्याची माहिती दिल्ली पोलिसांचे जनसंपर्क अधिकारी मनदीप रंधावा यांनी पत्रकारांना दिली.
दोन विशेष तपास पथके स्थापन करण्यात आली असून सखोल चौकशी करून दोषींविरोधात गुन्हे दाखल केले जातील. केंद्रीय गृह मंत्रालयाने दिल्ली पोलीस आयुक्त अमूल्य पटनायक यांची उचलबांगडी केली असून त्यांच्या जागी तीन दिवसांपूर्वी विशेष आयुक्तपदी (कायदा-सुव्यवस्था) नियुक्त करण्यात आलेले एस. एन. श्रीवास्तव यांच्याकडे पोलीस आयुक्त पदाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे. ‘आयबी’चे कर्मचारी अंकित शर्मा यांच्या हत्येप्रकरणी ‘आप’चे नगरसेवक ताहीर हुसेन यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शर्मा यांचा मृतदेह नाल्यात आढळला होता. या मृत्यूच्या चौकशीसाठी फोरेन्सिक तज्ज्ञांचा गट तयार करण्यात आला आहे.
दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दंगलीत घर भस्मसात झालेल्या कुटुंबांना २५ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा केली असून पुढील दोन दिवसांत पैसे थेट बँक खात्यात जमा केले जातील वा धनादेश दिला जाणार आहे. दंगलग्रस्त भागांमध्ये मदत व पुनर्वसनाचे काम हाती घेण्यात आल्याची माहिती केजरीवाल यांनी पत्रकारांना दिली. ज्या जखमींना सरकारी रुग्णालयात दाखल केले गेले नाही त्यांना खासगी रुग्णालयात उपचारांसाठी पाठवले जात आहे. हिंसाचारात अनेकांची घरे, दुकाने जळून खाक झाली असून अन्नधान्यांची मोठय़ा प्रमाणावर कमतरता आहे. त्यासाठी दिल्ली सरकारने यंत्रणा कार्यान्वित केली असून लोकांना अन्नधान्य आणि पाण्याची व्यवस्था केली जात असल्याचेही केजरीवाल यांनी सांगितले. अनेक लोक बेघर झाले असून त्यांच्या निवाऱ्याची ताप्तुरती सोय उपलब्ध करून दिली जात आहे.