Chaupher News
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व प्रकारच्या सोशल मीडियामधून अलिप्त राहण्याचा विचार ट्विटरवरुन बोलून दाखवल्यानंतर देशात सर्वत्र अनेक चर्चांना उधाण आलं आहे. मात्र, काही लोकांच्या मते मोदी रविवारी काहीतरी नवी कल्पना घेऊन येऊ शकतात.
भारत सरकार एखादा नवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म घेऊन येणार असल्याचं हे सूचक असल्याचं काहींचं म्हणणं आहे. मात्र, यासाठी आपल्याला रविवारपर्यंत वाट पहावी लागणार आहे. कारण पंतप्रधान नेहमीच अशा प्रकारे धक्कादायक पावलं उचलत असतात. यापूर्वीही अनेकदा देशवासियांनी याचा अनुभव घेतला आहे.
पंतप्रधानांच्या या ट्विटवर भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय म्हणाले की, “जगात असे खूपच कमी राजकीय नेते असतील ज्यांनी मोदींप्रमाणे सोशल मीडियाचा इतक्या चांगल्या प्रकारे वापर केला असेल. पंतप्रधानांना नक्की काय म्हणायचंय याबाबत अत्ताच कुठल्या निष्कर्षापर्यंत पोहोचणे योग्य ठरणार नाही. सोशल मीडिया आपल्या समाजाचे प्रतिबिंब आहे. तिथं चांगले आणि वाईट लोकही आहेत. मात्र, पंतप्रधानांना नक्की काय म्हणायचं आहे. त्यांच्या मनात नक्की काय आहे यासाठी आपल्याला रविवारपर्यंत वाट पहावी लागेल.”