राज्यात दिवसागणिक कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. कोरोनाचा फैलाव वाढू नये म्हणून देशासह राज्यात २१ दिवसांचा लॉकडाउन सुरु आहे. दरम्यान, करोनाग्रस्तांची वाढणारी संख्या ही धोक्याची घंटा आहे असं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. लॉकडाउनचा काळ कदाचित वादही शकतो असेही संकेत अजित पवार यांनी दिले आहेत. लोकांनी गर्दी केली नाही, बेजबाबदारपणे वागणं सोडलं नाही तर लॉकडाउन वाढूही शकतो. याबद्दलचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.
इटली, अमेरिका, स्पेनमधील कोरोना बळींपासून धडा शिकून जनतेने आता तरी शहाणं व्हावं. जीवाची जोखीम पत्करुन कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या डॉक्टर, पॅरामेडिकल स्टाफ, पोलीस, सफाई कामगार, या सगळ्यांच्या त्यागाचा सन्मान करावा. भाजी खरेदीसाठी गर्दी करणं बंद करावं. घरातच थांबून कोरोनाविरुद्धच्या लढ्यात योगदान द्यावं, असं आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी नागरिकांना केलं.
“बेजबाबदारपणाने वागणाऱ्या मोजक्या व्यक्तींमुळे कोरोनाविरुद्धच्या लढ्याला धक्का बसत आहे. हा बेजबाबदारपणा आता सहन केला जाणार नाही. कोरोनाविरुद्धचा लढा जिंकायचा असेल, बेजबाबदारपणा दाखवणाऱ्यांची, नियम मोडणाऱ्यांची यापुढे खैर केली जाणार नाही,” असं अजित पवार म्हणाले.