चौफेर न्यूज – करोना रोगाचा प्रादुर्भाव किती जबरदस्त आहे हे तुम्हीदेखील जाणता असं मी मानतो. मग इतक्या मोठ्या संख्येने या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी घराबाहेर काढून त्यांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आरोग्य धोक्यात घालण्यामागचं प्रयोजन काय ? टाळेबंदीमुळे अर्थव्यवस्थेचं होणारं अपरिमित नुकसान जाणून देखील देशाने इतकी मोठी टाळेबंदी झेलली. का तर जीव वाचला तर पुढे सगळं शक्य आहे. मग याच न्यायाने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करुन परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घ्यायला काय हरकत आहे?,” अशी विचारणा राज ठाकरे यांनी केली आहे. मे महिना संपत आला तरी राज्यातील विविध विद्यापीठांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षांचा निर्णय होत नाहीये आणि यामुळे लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात आहे मला विद्यापीठांचे कुलपती नात्याने तुमच्या निदर्शनास आणून द्यायचं आहे असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
परीक्षा रद्द करणे म्हणजे विद्यार्थ्यांना सरसकट पास करणे असं होत नाही. आधीच्या सेमिस्टर्सच्या किंवा महाविद्यालयात घेतलेल्या अंतर्गत परीक्षांच्या गुणाच्या आधारे निकाल लावता येईल. मला खात्री आहे की, शिक्षणतज्ज्ञांनी या विषयी मार्गदर्शन केले असेल. जर तसे नसेल तर आमचं शिष्टमंडळ विद्यापीठांना या विषयी नक्की मार्गदर्शन करेल. करोनामुळे उद्भवलेली परिस्थिती इतकी भीषण आहे की, देश गेले दोन महिने लॉकडाउनमध्ये आहे आणि सध्याची किमान मुंबई आणि पुणे परिसरातील परिस्थिती पाहता हा भाग अजून किती काळ टाळेबंदीत राहील याचं भाकीत कोणीच करु शकत नाही. बरं जर लॉकडाउन शिथील झाला तरी याचा अर्थ करोना संपला असा होत नाही हे आपणदेखील जाणता. अशा परिस्थितीत अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचा अट्टहास कशासाठी आणि कोणासाठी ?,” अशी विचारणा राज ठाकरे यांनी केली आहे.
निव्वळ विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून आणि अभूतपूर्व परिस्थिती लक्षात घेऊन या परीक्षा रद्द कराव्यात आणि यात कुठल्याही राजकारणाला तुम्ही थारा देऊ नये.