चौफेर न्यूज – महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढते आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने जुलैपासून शाळा सुरू करण्याबाबत शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक – पालक सभा बोलावण्याचे काढलेले फर्मान तात्काळ मागे घेण्यात यावे, अशी मागणी मुख्याध्यापक संघाच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी मागणी करण्यात आली आहे.
नाशिक आणि महाराष्ट्र कोरोना संकटातून मुक्त झाल्याचे शासनाने आधी जाहीर करावे आणि मगच शाळा, कॉलेज फिजिकली सुरू करण्याबाबतचा निर्णय घ्यावा. तोपर्यंत शिक्षणात खंड पडू नये यासाठी आनलाइन, टीव्ही, वर्कबुक, प्री लोडेड टॅब अशा सगळ्या पर्यायांचा विचार करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच केली आहे. २ कोणत्याही परिस्थितीत तूर्त शाळा उघडण्यात येऊ नयेत. कोविड ड्यूटीवर असणाऱ्या शिक्षकांना ताबडतोब परत बोलवावे. सर्व शिक्षकांनी वर्क फ्रॉम होम पद्धतीने अध्यापनाचे कार्य सुरू ठेवावे. वर्क फ्रॉम होममध्ये वर्क लोड वाढतो ही बाब लक्षात घेऊन अन्य आस्थापनेवर गेलेल्या सरप्लस शिक्षकांना त्यांच्या मूळ शाळेत पुन्हा बोलवावे. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ आणि २०२१-२२ क्लब करून, सुट्ट्या कमी करून झालेले शैक्षणिक नुकसान आम्ही शिक्षक भरून काढू, अशी ग्वाही देण्यात आली आहे.
सध्या कोरोनाचा पाचवा आणि महाभयंकर टप्पा सुरू आहे. शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे अशा परिस्थितीत १ जुलैपासून शाळा सुरू करणे योग्य वाटत नाही. ही भयानक परिस्थिती आटोक्यात येऊ द्या, मगच निर्णय घ्यावा. आम्ही सुट्टीच्या दिवशी शाळा चालवून सर्व अभ्यासक्रम पूर्ण करून मुलांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची काळजी घेऊ. मुलांना कोरोनाची लस मिळत नाही तोवर आम्ही आमच्या मुलांना शाळेत पाठविणार नाही, असे पालकांचे स्पष्ट मत आहे.