चौफेर न्यूज – कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता शाळामहाविद्यालयांसह खाजगी शिकवणी वर्ग बंद करण्यात आले होते. एप्रिल-मे हे महिने शिकवणी वर्गाचा प्रारंभ असतो. नेमक्या त्याच कालावधीत लॉकडाऊन असल्याने तेव्हापासून शिकवणी वर्ग बंद करण्याचे आदेश देण्यात आले. आता अनलॉक असल्याने हळुहळू शाळा-महाविद्यालयांसोबतच हेअर सलूनसह इतर दुकानांना परवानगी मिळाली; परंतु विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या शिकवणी वर्गाबाबत अद्यापही निर्णय न झाल्याने शिकवणी संचालक अडचणीत सापडले आहेत.
राज्यात सुमारे एक लाखांवर खाजगी शिकवणी वर्ग आहेत. याच शिकवणी वर्गाच्या आधारावर सुमारे पाच लाख कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. सुमारे १० टक्के शिकवणी संचालकांची आर्थिक परिस्थिती चांगली असली तरी ९० टक्के शिकवणी घेणारे उच्चशिक्षित असून साधारण कुटुंबातले असल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन फक्त शिकवणी आहे. कुटुंबातील आजार, इतर अडचणी तसेच कुटुंबाचे पालनपोषण शिकवणीच्या भरवशावर चालते. शिकवणीच बंद असल्याने यांच्या जगण्याचाच प्रश्न निर्माण झाला आहे. १ जलैपासन ९ वी ते १२ वीची शाळा सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली. सलूनची दुकाने सुरू होणार आहेत. मग केवळ खाजगी शिकवणी वर्गावरच अद्यापही बंदी का? असा प्रश्न शिकवणी घेणाऱ्यांनी उपस्थित केला आहे.
शासनाने १ जुलैपासून शाळा सुरू करण्यास परवानगी दिली. त्याचप्रमाणे मर्यादित विद्यार्थी संख्येच्या अटींवर खाजगी शिकवणीस परवानगी द्यावी. ग्रामीण भागात अनेक उशिक्षित गृहिणी शिकवणी घेतात. त्यावर त्यांचाउदरनिर्वाह चालतो. सद्यपरिस्थितीत सर्वांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. अनेक लहान शिकवणी वर्गबंद झाल्याने जगण्याचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे शासनाने खाजगी शिकवणी सुरू करण्यास परवानगी द्यावी.