चौफेर न्यूज – शाळा सुरू होऊन १५ दिवसांचा कालावधी उलटला आहे. तरीदेखील शिक्षणाच्या ‘ज्ञानाचा दिवा’ घरोघरी तेवत असल्याचे अजूनही दिसत नाही.शाळेचा पहिला दिवस ऑनलाइनच्या वर्गापासून करण्याचा संकल्प केवळ फार्स ठरला आहे. दुर्दैवाने, ना शाळा सुरु झाल्या, ना
ऑनलाइन धडे मिळत असल्याचे वास्तव शिक्षण विभागालाही ज्ञात नाही. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य सध्यातरी अधांतरीच आहे. कोरोनाच्या संकटकाळातही यंदाचे शैक्षणिक वर्ष वेळेत सुरु केल्याचा टेंभा शिक्षण खात्याने मिरवला; पण दोन आठवडे उलटले असतानाही जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळांचे विद्यार्थी अद्यापही अंधारातच चाचपडत आहेत. आनलाइन शिक्षणाच्या नावाखाली काही शाळांनी महागडे टॅब विद्यार्थ्यांच्या माथी मारले आहेत. शासनाच्या दिक्षा अॅपसह झूम अॅपच्या माध्यमातून शैक्षणिक धडे देण्याच्या मानसिकतेत असलेल्या शाळा त्यासाठीदेखील मोठे शुल्क आकारण्याच्या तयारीत आहे.
तांत्रिक अडचणी आणि महाजाल ऑनलाइन लेक्चर, शिक्षणाच्या नावाखाली विद्यार्थ्यांनी पालकांच्या मोबाईलवर ताबा मिळवला आहे. टिकटॉक, गेम्स, व्हिडिओज, व्हॉट्सअॅप आदींमध्येच विद्यार्थ्यांचा वेळ सध्या वाया जात आहे. मोजक्या शाळा ऑनलाइन धडे देत असल्या तरी इंटरनेट कनेक्टिव्हीटी व्यवस्थित नसल्याने उद्भवणाऱ्या तांत्रिक अडचणी विद्यार्थ्यांच्या पाचवीलाच पुजलेल्या आहेत. मोबाईल हाताळताना काही विद्यार्थ्यांकडून चुकीने अॅप्लिकेशनच डिलीट होत आहेत. काही जाणीवपूर्वक नको ते अॅप डाऊनलोड करून इंटरनेटच्या महाजालात अडकत असल्याच्या समस्या दिसून येत आहेत.