चौफेर न्यूज – नवीन शैक्षणिक धोरणाला केंद्रीय मंत्रीमंडळाने गुरुवारी (ता.३०) मान्यता दिली. तब्बल ३४ वर्षानंतर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात महत्त्वपुर्ण बदल करण्यात आला. विद्यार्थ्यांवरील परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी बोर्ड परीक्षेत काही बदल केले जाणार आहे. त्यामुळे तणामुक्त वातावरणात बोर्ड परीक्षा घेण्याचे धोरण आखण्यात आले. मात्र समाज माध्यमांवर बोर्ड परीक्षांबाबत विविध गैरसमज निर्माण झाले. नवीन शैक्षणिक धोरणानुसार दहावी आणि बारावीची बोर्ड रद्द होणार आहे, त्यामुळे विद्यार्थी अभ्यास करणार नाहीत असा संभ्रम निर्माण झाला होता. मात्र नवीन शैक्षणिक धोरणात दहावी, बारावीची बोर्ड परीक्षा नियमीत होणार आहे असे स्पष्ट करण्यात आले होते.
बोर्ड परीक्षा पद्धतीत बदल
बोर्डाची परीक्षा द्यायची म्हटलं की विद्यार्थ्यांच्या कपाळावर आट्या पडतात. बोर्डाच्या परीक्षेच टेन्शन विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यार सतत जाणवत असतं. विद्यार्थ्यांना टेन्शनमुक्त करण्यासाठी नवीन शैक्षणिक धोरणात काही बदल सुचवले आहे. पुर्वी वर्षभर अभ्यास करुन विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षा द्यावी लागायची, काही कारणामुळे परीक्षा देता आली नाही तर विद्यार्थ्यांचे वर्षभर नुकसान व्हायचे. त्यावर पर्याय म्हणून दोन वेळा बोर्ड परीक्षा देण्याची संधी नवीन धोरणात दिली जाणार आहे. पहिली संधी बोर्डाने ठरवलेली मुख्य परीक्षा, ही परीक्षा काही कारणामुळे विद्यार्थ्यांना देता आली नाही तर दुसऱ्यावेळी पुन्हा बोर्डाची परीक्षा देता येणार आहे. विद्यार्थ्यांना विषय निवडण्याचे स्वातंत्र्य दिले जाणार आहे. त्यामुळे आवडत्या विषयाची परीक्षा देण्यासाठी विद्यार्थी उत्सुक असतील. पेपर पॅटर्न दोन भागात असेल त्यात एक वर्णणात्मक आणि वस्तूनिष्ठ प्रश्नांचा असले. हा पेपर पॅटर्न फक्त घोकमपंट्टीवर सोडवता येणार नाही तर विद्यार्थ्यांना आकलनावर सोडवता येणार आहे.