चौफेर न्यूज – कोरोना काळात विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये म्हणून नीट आणि जेईई मेन परीक्षा लांबणीवर टाकाव्यात असे, मत राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी गुरुवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना मांडले. शाळा सुरू करण्याविषयीदेखील त्या बोलल्या. वर्षा गायकवाड म्हणाल्या, ‘राज्यातील एमपीएससी परीक्षाही लांबणीवर पडलेल्या आहेत. शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. त्यात परीक्षांसंदर्भातील संभ्रमाची भर पडली आहे. नक्की काय होणार हे त्यांना माहिती नाही. या परीक्षा लांबणीवर टाकल्या तर ते विद्यार्थीहिताचे असेल.’
केंद्र सरकारने परवानगी दिली तर भविष्यात दहावीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग प्राधान्याने सुरू करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असेल, केंद्रीय गृहमंत्रालयाने स्टॅँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स जारी करून परवानगी दिली तर शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करता येतील. दहावीचे वर्ग सर्वात आधी नंतर बारावी आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर वर्ग सुरू करण्याची राज्य सरकारची भूमिका असेल, असं गायकवाड म्हणाल्या, केंद्र सरकारने शाळा उघडण्याबाबतची योजना तयार केली आहे. यानुसार देशातील शाळा आणि अन्य शैक्षणिक संस्था येत्या १ सप्टेंबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत टप्प्याटप्प्याने उघडण्याचा सरकार विचार करत आहे. मात्र अंतिम निर्णय त्यांनी राज्य सरकारांवर सोडला आहे.