चौफेर न्यूज – अंतिम वर्षांच्या परीक्षा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून घेतल्या जातील तसेच 31 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान त्याचे निकाल येतील. या परीक्षा कमी मार्काच्या असतील तसंच शक्य झाल्यास घरातून परीक्षा देण्याची मुभा विद्यार्थ्यांना दिली जाण्याची शक्यता असल्याचे उदय सामंत यांनी सांगितलं आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर परीक्षा कशा घ्यावी यासाठी समिती नेमली होती. आज या समितीबरोबर तसंच इतर कुलगुरूंशी चर्चा झाली. सर्व विद्यापीठातील 7 लाख 92 हजार 385 विद्यार्थ्यांची परीक्षा घ्यायची आहे. विद्यापीठांनी शासनाला विनंती केली आहे.
यूजीसीकडे 31 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ मागावी. काही विद्यापीठांनी 10 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ मागावी अशी विनंती केली आहे. आम्ही आज याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहोत. परवा आपत्कालीन व्यवस्थापन समितीची बैठक होईल असे उदय सामंत म्हणाले.
विद्यार्थींना घराबाहेर पडून परीक्षा द्यावी लागणार नाही. परीक्षा कशा पद्धतीने, कोणत्या सोप्या पद्धतीने घ्यायच्या याबाबत समिती परवा आपला प्रस्ताव सादर करणार आहे. विद्यार्थींनी घरातूनच परीक्षा द्यावी याबाबत कुलगुरूंचे एकमत झालं आहे. असं देखील त्यांनी म्हटलं आहे.
ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा घेतल्या जातील असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे. ‘काही विद्यापीठे ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत निकाल लावतील.
कोरानाच्या काळात परीक्षा घेणं जिकिरीचे आहे, पण कुलगुरू ते योग्य पद्धतीने पार पाडतील. परीक्षा कमी मार्कांची असेल त्यामुळे विद्यार्थ्यांवर ताण येणार नाही. असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे.