चौफेर न्यूज
– मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑगस्ट महिन्यात केंद्र सरकारला नवीन वर्षापासून शैक्षणिक वर्ष सुरू करण्यासाठी प्रस्ताव पाठवला आहे. त्यावरुन अनेक शिक्षण तज्ज्ञामध्ये मतभेद आहे. जानेवारीपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू केले तर, विद्यार्थ्यांचे एक वर्षांचे नुकसान होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. कोरोना साथरोगामुळे विद्यापीठ स्तरावरील अंतिम वर्षांच्या लांबलेल्या परीक्षा, तसेच अद्यापही शाळा-महाविद्यालयेही बंद ठेवण्यात आल्याने थेट जानेवारीपासूनच नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करावे, असा विचार पुढे आला आहे.
मात्र, उच्च शिक्षण विभाग व शालेय शिक्षण विभाग यांच्यात त्याबाबत मतभिन्नता आहे. उच्च शिक्षण विभागाची त्याबाबत काहीशी अनुकूलता असली तरी शालेय शिक्षण विभागातून प्रतिकूल मत व्यक्त केले जात आहे. अंतिम वर्षांच्या परीक्षा साधारणत: ऑक्टोबरच्या पहिल्या आाठवडय़ात घेण्याचे व त्याच महिन्याच्या अखेपर्यंत निकाल जाहीर करण्याचे सूतोवाच उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केले. त्यासंदर्भात राज्यपाल व कुलगुरूंच्या स्तरावर बैठका सुरू आहेत. परीक्षांना होणारा विलंब लक्षात घेऊन नवीन शैक्षणिक वर्ष जानेवारी २०२१ पासून सुरू करावे, असा विचार पुढे आला आहे. उच्च शिक्षण विभागात त्याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे. परंतु त्यासंदर्भात अजून काही ठोस निर्णय झालेला नाही, असे या विभागातील उच्चपदस्थाकडून सांगण्यात आले. राज्यात शैक्षणिक वर्षांत बदल करायचा झाला तर तो शालेयस्तरापासून विद्यापीठ स्तरापर्यंत करावा लागेल. कोरोना संपल्यानंतरही शैक्षणिक वर्षांचा तोच कालावधी ठेवावा लागेल, असे या विभागाचे म्हणणे आहे.