चौफेर न्यूज – दहावी आणि बारावीच्या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांच्या फेरपरीक्षा ऑक्टोबर महिन्यात न घेण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे, याबाबत राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली.
फेब्रुवारी- मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या शालांत परीक्षेत नापास झालेल्या विद्यारर्थ्यांची फेरपरीक्षा ही बहुतेकवेळा ऑक्टोबर महिन्यात घेतली जाते. मात्र, यंदा करोनाचे संकट असल्याने ऑक्टोबर महिन्यात घेण्यात येणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. कदाचित ही नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात घेण्याची शक्यता आहे.
दहावीमध्ये सुमारे 1 लाख 25 हजार विद्यार्थी तर बारावीमध्ये 1 लाख 80 हजार विद्यार्थी नापास झाले आहेत. सोबतच काही विद्यार्थी असेही आहेत ज्यांना एटीकेटीदेखील प्राप्त झाली आहे. दहावीतील एटीकेटी विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाची परवानगी आहे. परंतु, नापास आणि एटीकेटी विद्यार्थ्यांना एक संधी म्हणून आपण फेरपरीक्षा घेण्याचा विचार करत आहोत, असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
राज्याचा दहावीचा निकाल महिन्यात जाहीर करण्यात आला होता. राज्याचा निकाल 95.30 टक्के लागला. राज्यात 96.91 टक्के मुली पास झाल्या. तर 93.90 टक्के मुलांनी बाजी मारली. यंदा 3.1 टक्क्यांनी मुलींचा निकाल जास्त लागला. तर कोकण विभागाने दरवर्षीप्रमाणे यंदाही बाजी मारली आहे. तर औरंगाबाद विभाग हा निकालामध्ये सर्वात मागे आहे.
राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून विज्ञान, कला, वाणिज्य आणि एचएसची व्होकेशनल या शाखांमधील बारावी परीक्षेला एकूण 14 लाख 20 हजार 575 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 14 लाख 13 हजार 687 विद्यार्थी परीक्षेला पात्र ठरले होते. त्यापैकी 12, 81, 712 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी 90.66 टक्के आहे.