चौफेर न्यूज – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सावंत यांनी अंतिम वर्षाच्या परीक्षेमध्ये काही महत्त्वाच्या बदलाचे संकेत दिले, यंदा अंतिम वर्षाची परीक्षा ३ तास ऐवजी १ तासाची घेण्यात येईल. दरवेळी 100 गुणांची घेतली जाणारी परीक्षा यंदा मात्र 50 गुणांची बहुपर्यायी होईल. विद्यार्थ्यांना बहुपर्यायी प्रश्न, असाइन्मेंट, ओपन बुक असे विविध पर्याय उपलब्ध करुण देण्याच्या सूचना सावंत यांनी विद्यापीठांना दिल्या.
कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता विद्यार्थ्यांना घरी बसूनच परीक्षा देण्याची सोय विद्यापीठाने उपलब्ध करून द्यावी, त्यास मीटींग ॲप, झूम अॅप, जीमेल, कॉलींग, व्हॉट्सअॅप अशा ऑनलाईन तंत्रज्ञानाच वापर करून विद्यार्थ्यांना परीक्षा घेता येतील का? याचा विचार विद्यापीठांनी करावा. अभ्यासक्रम, वेळापत्रक, परीक्षा पद्धती यांची निश्चिती करुन सात सप्टेंबरपर्यंत विद्यापीठांनी सरकारला सविस्तर माहिती सादर करावी अशा सुचना विद्यापीठांना दिल्या.
उदय सावंत यांनी ‘या’ सुचना विद्यापीठांना दिल्या
- विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून विद्यापीठांनी कमी वेळात परीक्षा आयोजित कराव्यात
- या परीक्षा शक्यतो ऑनलाईन पद्धतीने घेण्यात याव्या, ज्या ठिकाणी ऑनलाइन परीक्षा घेणे शक्य नसेल तेथे ऑफलाइन, ऑनलाइन दोन्ही पद्धतीचा वापर करावा.
- काही कारणामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नाही तर पुन्हा परीक्षा आयोजित कराव्या
- दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी खास सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्या
- पेन, पेपर, पाणी इत्यादी साहित्य विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देण्याची व्यवस्था करावी
- एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही याचे नियोजन विद्यापीठांनी करावे
- प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा शक्यतो प्रयत्न करावा
- एटीकेटी विद्यार्थ्यांचे पेपर याच पद्धतीने घेण्यात यावे
- एमसीक्यू, ओपन बुक यापैकी एक पर्याय विद्यापीठाने स्वाकारावा
- विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याचा विचार विद्यापीठांनी करावा.
- स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन काही अडचण आल्यास सरकारला तात्काळ माहिती द्यावी जेणेकरून या संदर्भात युजीसीला माहिती कळवता येईल आणि परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेता येईल