पिंपरी ः नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने स्वच्छ भारत अभियान सुरू केले आहे. त्या अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2017 चे आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये राज्यातील 44 स्थानिक स्वराज्य संस्थांचा सहभाग होणार असल्याची माहिती स्वच्छ भारत मिशनचे संचालक डॉ. उदय टेकाळे यांनी दिली.
पिंपरी-चिंचवड महापालिका व महाराष्ट्र शासनाच्या स्वच्छ महाराष्ट्र अभियान संचालनालयाच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील सर्व महापालिका व नगरपालिकांच्या अधिका-यांसाठी स्वच्छ सर्वेक्षण 2017 विषयक कार्यशाळेचे चिंचवड येथील ऑटो क्लस्टरच्या सभागृहात उदघाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पिंपरी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे, अमरावती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सोमनाथ शेटे, नाशिक महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डी. के. बोरडे, सहआयुक्त दिलीप गावडे, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी नीलकंठ पोमण आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ. टेकाळे म्हणाले की, नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने स्वच्छ भारत अभियान सुरू केले आहे. त्याअंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2017 चे आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये राज्यातील 44 स्थानिक स्वराज्य संस्थांचा सहभाग असणार आहे. देश पातळीवर होणा-या या उपक्रमात पहिल्या 50 शहरांमध्ये महाराष्ट्रातील किमान 10 शहरांनी स्वच्छतेच्याबाबतीत आपले स्थान पटकवावे, अशी शासनाची अपेक्षा असल्याचे ते म्हणाले. या सर्वेक्षणांतर्गत दोन हजार गुणांसाठी 111 निकष केंद्र शासनाने ठरविले आहेत.
या कार्यशाळेत पिंपरी-चिंचवड महापालिकेचे मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी नीलकंठ पोमण व क्रिसिलचे समीर पालपार्थी यांनी स्वच्छ सर्वेक्षण 2017 च्या भाग 1 व भाग 2 हे सादरीकरण केले. तसेच पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरमचे अमोल देशपांडे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांकडून नागरिकांच्या स्वच्छता विषयक अपेक्षा व त्यांचे निराकरण ई- गव्हर्नन्सच्या माध्यमातून कशाप्रकारे करता येईल. याबाबतचे सादरीकरण केले. तर स्वच्छ सर्वेक्षण अॅपचे सादरीकरण बेंगलोर येथील जनाग्रह संस्थेचे सिनियर मॅनेजर सुमित अरोरा यांनी केले. या कार्यशाळेमध्ये पिंपरी-चिंचवडसह मालेगाव, यवतमाळ, उल्हासनगर, बीड, कल्याण-डोंबिवली, धुळे, अंबरनाथ, कोल्हापूर, पुणे, नवीमुंबई, भिवंडी, बृहन्मुंबई, शिर्डी, अकोला, मिराभाईंदर, सोलापूर, सांगली, पनवेल, कुळगाव, नंदुरबार, लातूर, ठाणे, नाशिक, भुसावळ, वसई-विरार, अमरावती, जळगाव, नागपूर नगरपालिका व महापालिकांचे अधिकारी उपस्थित होते.