मालेगाव ः खान्देश अहिराणी कस्तुरी मंच व नाशिक महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रात प्रथमच खान्देश साहित्य, सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन येत्या 3 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता नाशिक येथे करण्यात आले आहे.
कालिदास कलामंदिरात आयोजित या महोत्सवाचे उद्घाटन सुप्रसिद्ध उद्योजक उमेशभाई राठी यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून तुळशीदास भोईटे, आमदार बाळासाहेब सानप, महापौर अशोक मुर्तडक उपस्थित राहणार आहेत. स्वागताध्यक्ष म्हणून नगरसेवक सलीम शेख व उपमहापौर अशोक गुरुमित बग्गा राहतील. यानिमित्ताने बहुभाषिक कवी संमेलन तसेच आमंत्रित अहिराणी कवी समंलेन होईल. राज्यभरातील कवी, साहित्यिक यात सहभागी होणार आहेत. दि. 3 व 4 नोव्हेंबरपर्यंत हा महोत्सव सुरु राहिल.
महोत्सवाचा समारोप दि. 4 रोजी दुपारी 4 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत होईल. शहरासह परिसरातील अहिराणी साहित्यिकांनी या महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजन समितीच्या विजया मानमोडे यांनी केले आहे.