चौफेर न्यूज – सुप्रीम कोर्टाने कोरोनामुळे 2020 मध्ये यूपीएससीची परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा देण्यास नकार दिला आहे. गेल्यावर्षी परीक्षा न देऊ शकल्यामुळे आणखी एक संधी मिळावी यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती; मात्र कोर्टाने ही याचिका फेटाळली. ज्या विद्यार्थ्यांना 2020 मध्ये यूपीएससी परीक्षेसाठी शेवटची संधी होती, मात्र त्यांना कोरोना आणि लॉकडाऊनमुळे ही परीक्षा देता आली नव्हती, अशा विद्यार्थ्यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती ए एम खानविलकर, इंदू मल्होत्रा आणि अजय रस्तोगी यांच्या खंठपीठासमोर झाली.
कोरोना काळात शाळा, कॉलेज अशा सर्वच परीक्षा एक तर पुढे तरी ढकलण्यात आल्या किंवा ऑनलाईन तरी घेण्यात आल्या. मात्र, लॉकडाऊनच्या काळात स्पर्धा परीक्षा नियोजित वेळापत्रकापेक्षाही उशिरा म्हणजेच ऑक्टोबर 2020 मध्ये घेण्यात आल्या होत्या. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला. त्यामुळे, ज्या विद्यार्थ्यांना 2021 ची युपीएसी पूर्वपरीक्षा उत्तीर्ण करता आली नाही, त्यांना ठरलेल्या संधींपेक्षा एक अतिरिक्त संधी मिळावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. मात्र, कोर्टाने स्पष्ट शब्दांत ही याचिका फेटाळून लावली.