चौफेर न्यूज – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रथम सत्राची परीक्षेसाठी एजन्सी नेमण्याविषयी अजूनही अनिश्चितता आहे. पूर्वीची एजन्सी कायम ठेवावी, असे परीक्षा विभागाचे म्हणणे आहे. तर पूर्वीच्या एजन्सीची निवड ही एकाच सत्रासाठी होती. त्यामुळे हे काम पुन्हा निविदांद्वारे नवीन एजन्सीला देण्याचा आग्रह धरला जात आहे. कोट्यवधी रुपयांच्या परीक्षेच्या कामासाठी एजन्सी निवडीवरून विद्यापीठातील अंतर्गत राजकारण पुढे आले आहे. यामुळे सुमारे साडेसहा लाख विद्यार्थ्यांची परीक्षा मात्र लांबणीवर पडणार आहे. नगर, नाशिक आणि पुण्यातील पदवी व पदव्युत्तरच्या प्रथम सत्राची परीक्षा 15 मार्चपासून घेण्यात येणार असल्याचे यापूर्वीच विद्यापीठाने जाहीर केले आहे. त्यानुसार परीक्षा विभागाकडून कामाचे नियोजन सुरू आहे. मात्र, मागील आठवड्यात झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत परीक्षेसाठी नवीन एजन्सी नेमण्याविषयी प्राथमिक चर्चा झाली. त्यातून आगामी परीक्षा नवीन एजन्सीद्वारे घ्याव्यात, यासाठी व्यवस्थापन परिषदेचे काही सदस्य आग्रही असल्याचे दिसून येत आहे. याउलट परीक्षा विभागाने पूर्वीची एजन्सीकडून परीक्षा होणार असल्याचे गृहित धरून परीक्षेचे नियोजन सुरू केले. परीक्षा पंधरा दिवसांवर येऊन ठेपली असताना, आता नव्या एजन्सीची चर्चा होत आहे. त्यावरून परीक्षा विभागातील अधिकाऱ्यांची धावपळ उडाली. नवीन एजन्सीची निवड प्रक्रियेसाठी निविदा आणि त्यांना सर्व कामकाज समजण्यासाठी महिनाभराचा कालावधी लागेल. त्यामुळे किमान महिनाभर परीक्षा पुढे ढकलावी लागणार आहे. त्यामुळे पूर्वीची एजन्सी कायम ठेवल्यास परीक्षा वेळेत घेणे शक्य होणार असल्याचे परीक्षा विभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या सर्व वादात मात्र तब्बल साडेसहा लाख विद्यार्थी भरडले जात असल्याचे चित्र आहे.