चौफेर न्यूज
– ऑनलाईन शिक्षणामुळे अभ्यासक्रमाचे कमी झालेले आकलन, अजून ३० टक्के शिल्लक असलेला अभ्यासक्रम, सराव आणि उजळणीला मिळत असलेल्या कमी कालावधी यामुळे यंदा दहावी, बारावीत असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये सत्रांत परीक्षेचा ताण वाढला आहे.
करिअरच्या दृष्टीने दहावी, बारावीचे गुण महत्त्वाचे ठरतात. त्यामुळे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये चिंता वाढली आहे. आणखी २५ टक्के अभ्यासक्रम कमी करण्याची मागणी पालकांकडून होत आहे. कोरोनामुळे दहावी, बारावीचे ऑनलाईन वर्ग जूनपासून सुरू झाले आहे. त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने नोव्हेंबरपासून ऑफलाईन वर्ग सुरू भरू लागले. त्यावेळी ऑनलाईन शिक्षणातून बहुतांश संकल्पना समजत नसल्याचे विद्यार्थ्यांनी शिक्षकांना सांगितले. त्यानुसार विद्यार्थिहितासाठी अनेक शाळांनी पहिल्यापासून शिकवण्यास सुरुवात केली.
कोरोना संसर्गाने उडविलेल्या गोंधळामुळे शासनाने आधीच २५ टक्के अभ्यासक्रम कमी केला. उर्वरित ७५ टक्के अभ्यासक्रमापैकी आतापर्यंत ४५ टक्के अभ्यासक्रम पूर्ण करण्यात आला असल्याचे विविध शाळांच्या शिक्षकांकडून मिळालेली माहिती आहे. ऑनलाईन शिक्षणालाही मर्यादा आहेत. किती मुले, किती वेळ सलग जॉईन होऊ शकतील, हाही प्रश्न आहे. दररोज विषय घेणे अवघड असल्याने दिवसाआड होणारे विषयाचे वर्ग, उर्वरित ३० टक्के अभ्यासक्रम पूर्ण करण्यात असलेली वेळेची अडचण या नव्या समस्या उद्भवल्या आहेत.