चौफेर न्यूज – देशात आणि राज्यात कोरोनाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या अधिक वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात १० वी आणि १२ वीच्या बोर्डाच्या परीक्षाबाबत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. १० वी, १२ वीच्या बोर्डाच्या परीक्षा घेणे हा विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ ठरू शकेल. त्यामुळे राज्यात १० वी, १२ वीच्या बोर्डाच्या परीक्षा रद्द कराव्यात, अशी मागणी आठवले यांनी केली आहे.
याबाबत आठवले म्हणाले, राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी १ ली ते ८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करून त्यांना थेट पुढच्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय योग्य आणि स्वागतार्ह आहे. याच प्रमाणे १० वी आणि १२ वीच्या बोर्डाच्या परीक्षा रद्द करून या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात वर्गोन्नती द्यावी, असे मंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे.
दरम्यान, राज्यातील शाळा बंद आहेत, परंतु शाळांकडून फी (शुल्क) आकारणी सुरूच आहे. एक तर विद्यार्थ्यांचं वर्ष वाया गेल आहे. आता १० वी १२ वीच्या परीक्षा होत आहेत, मात्र या परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश दिला जावा. कारण, ते कोणत्या मानसिकतेत असतील हे सांगता येत नाही, ते लहान आहेत. त्यांच्या मानसिकतेचा विचार व्हायरला हवा. पहिल्यांदाच आपल्यावर हा प्रसंग ओढवला आहे. म्हणून मी राज्य सरकारला विनंती करत आहे की, खालच्या विद्यार्थ्यांना जसं प्रवेश दिला आहे. १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांनाही पुढे ढकलावं, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेवेळी म्हटलं होतं.