चौफेर न्यूज – पहिली ते आठवीप्रमाणेच नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना वर्गोन्नती देऊन थेट दहावी आणि बारावीत प्रवेश देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. कोरोना परिस्थितीचा विचार करून माध्यमिक शाळा संहितेतील तरतुदीनुसार या विद्यार्थ्यांचे गुणांकन करण्याचा निर्णय मुख्याध्यापकांनी घ्यायचा असल्याच्या सूचना अध्यादेश जारी करून शिक्षण विभागाने दिल्या आहेत.
राज्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता या विद्यार्थ्यांनाही सरसकट पास करण्याची मागणी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे करण्यात आली होती. या मागणीनुसार विद्यार्थी हित लक्षात घेऊन नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांनाही सरसकट पास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शालेय शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे दहावीचा निकाल 100 टक्के लावण्यासाठी अभ्यासात मागे असलेल्या विद्यार्थ्यांना नववीतच नापास करणाऱया शाळांना यंदा चाप बसणार असून सर्वच विद्यार्थ्यांना दहावीत प्रवेश द्यावा लागणार आहे.
असे असेल गुणांकन
मुख्याध्यापकांनी विषय शिक्षकांची समिती नेमून शाळेत आयोजित केलेल्या चाचण्या, प्रात्यक्षिक परीक्षेचे अंतर्गत मूल्यमापन करून अथवा विषयनिहाय चाचण्या घेतल्या असल्यास त्याआधारे किंवा टय़ुटोरियल्स घरी सोडविण्यासाठी देऊन त्याआधारे विद्यार्थ्यांना गुण देण्याचा निर्णय शाळा आणि ज्युनियर कॉलेज स्तरावर घेण्यात यावा. याव्यतिरिक्त मुख्याध्यापक आपल्या सोईच्या कोणत्याही मूल्यमापन तंत्राचा वापर करून निकाल जाहीर करू शकतात. या मूल्यमापनाद्वारे विद्यार्थ्याला विषयनिहाय मिळालेल्या गुणांचा उल्लेख करून प्रगतीपुस्तक तयार करायचे आहे.