चौफेर न्यूज – दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची घोषणा नुकतीच शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी एक व्हिडीओ जारी करून केली आहे. परंतु या निर्णयाला विद्यार्थ्यांनी विरोध दर्शवल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा घ्या, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा सरकारला दिला आहे. परीक्षा कोरोना प्रादुर्भाव असल्यामुळे ऑनलाइन तरी घ्या किंवा रद्द तरी करून टाका, अशी भूमिका पुण्यातील विद्यार्थ्यांनी घेतल्याने आता सरकारच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.
शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी नुकताच एक व्हिडिओ जारी करून दहावीच्या परीक्षा जून महिन्यात तर बारावीच्या परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस होतील असं स्पष्ट केलं. परंतु विद्यार्थ्यांनी या निर्णयाला विरोध दर्शवला असून परीक्षा रद्द करा किंवा आत्ताच ऑनलाईन घ्या, अशी आक्रमक भूमिका घेतली आहे.
गेल्या काही दिवसांपासून दहावी बारावीच्या परीक्षेवरून अनेक चर्चांना उधाण आलं होतं. त्याच पार्श्वभूमीवर परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशाही मागणीने जोर धरला होता. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी बैठक घेऊन परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. परंतु, विद्यार्थ्यांच्या विरोधाला आता सरकार नेमकं कसं हाताळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.