चौफेर न्यूज – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे परीक्षा होतील की नाही असा संभ्रम निर्माण झाला आहे. रुग्णसंख्या वाढत असल्यानं शिक्षण मंत्रालय जाहीर केलेल्या तारखा सतत पुढे ढकलत आहे. अनेक राज्यांनी परीक्षा न घेताच विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. तर, काही राज्यांमध्ये परीक्षा तात्पुरत्या थांबवण्यात आल्या आहेत. जाणून घ्या कोणत्या राज्यांमध्ये परीक्षा न घेताच विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महाराष्ट्र –
राज्यात कोरोनाबाधितांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे राज्यातील पहिली ते नववीपर्यंत आणि 11 वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेविनाच पास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर, 10 आणि 12 ची परीक्षा तूर्तास स्थगित करण्यात आल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
तमिळनाडू –
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने 9वी आणि 11 वीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. तसेच 10 वीच्या बोर्डाच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री पलनीस्वामी यांनी दिली होती. तसेच 12 वीची परीक्षा 3 मे पासून सुरू होणार आहे.
राजस्थान –
राजस्थान सरकारनेही बोर्डाच्या परीक्षा स्थगित केल्या आहेत. तर, 8 वी, 9 वी आणि 11वी च्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
छत्तीसगड –
छत्तीसगडमध्येही 10वी आणि 12 वी व्यतिरिक्त इतर वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेविनाच पास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच 12 वीची परीक्षा 3 ते 24 मे दरम्यान होणार आहे.
ओडीशा –
ओडीशाच्या स्कूल अँड मास एज्यूकेशन डिपार्टमेंटने पहिली ते 9वी आणि 11वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेताच पुढच्या वर्गात प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला आहे. ओडीशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी राज्यातील सर्वच बोर्डाच्या परीक्षा स्थगित करण्याचे आदेश दिले आहेत.
आसाम –
सरकारने पहिली ते 9वी च्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता पुढील वर्गात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. आसामच्या शाळांमध्ये 1 एप्रिलपासून नवीन शैक्षणिक सत्र सुरू झाले आहे.
उत्तर प्रदेश –
उत्तरप्रदेश सरकारने पहिली ते 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना परीक्षांशिवाय पुढच्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तरप्रदेशात 9वी आणि 11वी च्या विद्यार्थ्यांबद्दल अद्याप कोणता निर्णय झाला नसून बोर्डाच्या परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत.
गुजरात –
सरकारनेपहिली ते 9वी च्या आणि 11 वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता पुढील वर्गात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. रुग्णसंख्या वाढत असल्यानं 10वी आणि 12वीची बोर्डाची परीक्षा स्थगित करण्यात आली आहे. परीक्षांच्या नवीन तारखांची घोषणा 15 मे नंतर होईल.
पंजाब –
मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी5वी, 8 वी आणि 10 वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेशिवाय पुढच्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच 12 वीच्या बोर्डाच्या परीक्षा स्थगित करण्यात आल्या असून 10चा निकाल प्री-बोर्डपरीक्षा और इंटरनल एसेसमेंटमध्ये मिळणाऱ्या गुणांच्या आधारे करण्यात येईल.
पुदुच्चेरी –
केंद्रशासित प्रदेश पुदुच्चेरीने देखील पहिली ते 9वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेताच पास केले आहे. उप राज्यपाल निवासाकडून शालेय शिक्षण विभागाच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे.
दिल्ली –
दिल्लीत रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे केजरीवाल सरकारने नर्सरी ते 8 वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना परीक्षेशिवाय पुढच्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे.