चौफेर न्यूज
– बारावीच्या परीक्षेत अंतर्गत मूल्यांकनातून मिळालेल्या गुणांवर समाधानी नसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सीबीएससी बोर्डाकडून विशेष परीक्षा घेतली जाणार आहे. 16 ऑगस्टपासून ही परीक्षा सुरू होणार असून ती 15 सप्टेंबरपर्यंत ती चालणार आहे. परीक्षा कुणासाठी? यंदा कोरोना संकटामुळं बारावीच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय सीबीएससी बोर्डानं घेतला होता. विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे गुण देण्यात आले होते. मात्र त्यापैकी काही विद्यार्थ्यांना हे गुण कमी वाटत असून प्रत्यक्ष परीक्षा घेतली, तर यापेक्षा अधिक गुण मिळतील, असा विश्वास आहे. अशा विद्यार्थ्यांना संधी देण्यासाठी CBSE बोर्डानं स्पेशल परीक्षा घेण्याचा सनिर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणं नापास विद्यार्थ्यांनादेखील परीक्षेला बसण्याची संधी मिळणार आहे. नापास झालेल्या विद्यार्थ्यांना दरवर्षी वेगळी परीक्षा घेऊन आणखी एक संधी दिली जाते. ती या परीक्षेद्वारे दिली जाणार आहे.
अशी होईल परीक्षा ही परीक्षा 16 ऑगस्ट ते 15 सप्टेंबरदरम्यान घेतली जाईल. या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना जितके मार्क्स मिळतील, ते मार्क्स अंतिम असतील. म्हणजेच, या परीक्षेत विद्यार्थ्यांना कमी गुण मिळाले, तर आधीचे गुण त्यांना वापरता येणार नाहीत. या परीक्षेला बसू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सीबीएससी बोर्डानं रजिस्ट्रेशन पोर्टल लवकरच सुरु केला जाईल, अशी माहिती दिली आहे.
2021 चा म्हणजे यंदाच्या निकालाच्या आधारे विद्यार्थ्यांना ऑनलाईन रजिस्ट्रेशन करता येणार आहे. तर काही विषयात नापास झालेल्या विद्यार्थ्यांचं नाव परीक्षेच्या यादीत अगोदरपासूनच असणार आहे. त्यांना वेगळं रजिस्ट्रेशन करण्याची गरज लागणार नाही. हे परीक्षा शुल्क नाही या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांकडून कुठलंही शुल्क न घेण्याचा निर्णय सीबीएससी बोर्डानं घेतला आहे. मात्र ही सवलत पास झालेल्या आणि पुन्हा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांपुरती मर्यादित असून नापास विद्यार्थ्यांना ठरलेलं शुल्क भरणं बंधनकारक असणार आहे.