औंध मिलिटरी स्टेशन येथे दहशतवादाविरोधात दोन्ही देशाचा संयुक्त लष्करी सराव
पिंपरी : दक्षिण आशियातील दहशतवाद विरोधात भारत आणि चीन हे दोन्ही देश एकत्र आल असून, या विरोधात लढा देण्यासाठी तसेच रणनिती आखण्यासाठी पुण्यात या दोन्ही देशांच्या लष्करी सरावास बुधवारी सुरूवात झाली. यानिमित्ताने जगातील हे महत्त्वपूर्ण देश एकमेकांसोबत असल्याचा संदेश दिला जात आहे.
एकूण दहा दिवस पुण्यात हा सराव केला जाणार आहे. याआधी यावर्षी जून महिन्यात चीनमध्ये तसेच ऑक्टोबरमध्ये पुण्यात या सरावासाठी नियोजन परिषद पार पडली होती. यानिमित्ताने दक्षिण आशियात पसरलेल्या दहशतवादविरोधात या दोन्ही देशांनी कडक पावले उचलली आहेत.
साऊथ एशियामधील दहशतवादाविरोधात लढा देण्यासाठी भारत-चीन एकत्र आले आहेत. दहशतवादविरोधी लढताना येणाऱ्या अडथळ्यांवर दोन्ही देशांनी लक्ष केंद्रित करायचे ठरवले आहे, असे मत ब्रिग्रेडीअर अलोक चंद्रा यांनी सांगितले. भारत-चीन यांच्यात संयुक्त लष्करी सरावास सुरूवात झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी चीनचे सिनिअर कर्नल चँग चियादीन
उपस्थित होते.
चंद्रा म्हणाले की, दहशतवाद्यांची उपकरणे शोधून त्यांच्या विरोधात लढताना आपली देखील उपकरणे आणि शस्त्रात्रे तयार करण्यात येणार आहेत. दहशतवादाविरोधात सर्च ऑपरेशन करणे हा यामागील हेतू आहे. या सरावातील विषय दोन्ही देशाला भेडसावत असणाऱ्या समस्या यामध्ये देखील लक्षात घेण्यात येणार आहेत. या आधी भारत-चीन यांच्यात याबाबत नियोजन करण्यात आले होते. यासाठी भारतात आणि चीनमध्ये बैठक देखील झाली होती.