“इनोव्हेटीव्ह वर्ल्ड स्कूल मध्ये भारतीय संस्कृतीचे दर्शन
प्रा. रामकृष्ण मोरे सभागृह येथे आयोजित “यात्रा – 05” वार्षिक स्नेहसंमेलनाचा मोठ्या जल्लोषात समारोप
पिंपरी : चिखली-मोशी आणि किवळे-रावेत येथील इनोव्हेटीव्ह वर्ल्ड स्कूलच्या वतीने चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे सभागृह येथे आयोजित “यात्रा – 05” वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. विद्यार्थ्यांनी पंजाबी, बंगाली, केरळी, मराठी आदी बहूभाषेतली गीतांवर नृत्य सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. महापारेषणचे महामुख्य व्यवस्थापक कैलाश कणसे (IPS), प्राचार्य शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कराडचे प्राचार्य डॉ. संजीव वाघ, विनय पंत आदी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून “यात्रा 05” वार्षिकोत्सवाची सुरुवात झाली. इनोव्हेटीव्ह वर्ल्ड स्कूलच्या प्रगतीचा आलेख स्वतः जवळून पाहिल्याचे सांगत विद्यार्थ्यांचे कौतुक जरूर करा पण हट्टाने मागणी केलेल्या वस्तू दिल्यामुळे, मुलांच्यात बदल होतोय. याचा वेळीच विचार करा असा मोलाचा सल्ला श्री. कणसे यांनी यावेळी दिला.
प्राचार्य डॉ. वाघ यांनी इनोव्हेटीव्ह वर्ल्ड स्कूलच्या यात्रेत विविध भारतीय संस्कृतीचे दर्शन झाल्याचे आपल्या मनोगतामध्ये सांगितले. विद्यार्थी गुण कौतुक सोहळ्यात कला, क्रिडा आणि शैक्षणिक विभागात गुणवत्ता प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना श्री. कणसे, डॉ. वाघ, श्री. पंत आदी मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
चिखली-मोशी येथील शाळेमध्ये गेली पाच वर्षे उत्कृष्टपणे सुरू असलेल्या अभ्यासक्रमास, विविध सामाजिक सांस्कृतिक उपक्रमास, विद्यार्थ्यांच्या सर्वगुण संपन्न विकासास इनोव्हेटीव्ह वर्ल्ड स्कूलच्या व्यवस्थापनाचे सहकार्य, शिक्षकांचे योगदान आणि पालकांचा सहभाग लाभला, त्याबद्दल सर्व मान्यवरांनी कौतुक केले. तसेच किवळे-रावेत येथे नव्याने सुरु झालेल्या शाळेच्या शाखेने पदार्पणातचं उतुंग भरारी घेतल्याचे सर्वत्र कौतुक झाले. संचालिका कमला बिष्ट यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे पालकांना उद्देशून सांगितले.
संचालक डॉ. संजय सिंग यांनी शाळेच्या योगदानातील सहभागी विद्यार्थांना आई, वडील, गुरू यांचे महत्त्व थोडक्यात विषद केले. चिखली-मोशी शाखेच्या प्राचार्या मंजू नौटीयाल आणि किवळे-रावेत शाखेच्या प्राचार्या तनपुरे मॅडम यांनी विद्यार्थ्यांचा प्रगती अहवाल आणि शाळेचा वार्षिक अहवाल सादर केला.
सकाळच्या सत्रात प्री-प्रायमरीच्या विद्यार्थ्यांनी आणि दुपारच्या सत्रात प्रायमरीच्या विद्यार्थ्यांनी कलागुण सादर केले. सासों की सरगम, गणेशवंदना, शंकर गीत, नमो नमो भारत अम्बे आदी गीतावर तसेच मकर संक्रांती, वैशाखी, होळी, ओणम, कृष्ण जन्माष्टमी, नारळी पौर्णिमा, नवरात्री, दिवाळी आदी पारंपरिक गीतनृत्ये सादर केली. तर शेतकरी गीत, कोळी गीत, वासुदेवाची स्वारी आदी संस्कृतीपर गीतनृत्ये आपली छाप सोडून गेली.
संत गोरा कुंभाराची विठ्ठल भक्ती या संगीतनृत्य नाट्याने पालकांची मने हेलावून टाकली. श्री राम भरत भेटीचा प्रसंग संगीत नाटक प्रहसनाद्वारे राममय झाला. श्री शिव तांडव, श्री दुर्गा पूजा, श्री हनुमान चालीसा, श्री कृष्ण लीला आदी नृत्यांनी पालकांचे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. बालचमूच्या घोषणांनी प्रेक्षागृहाचे वातावरण शिवमय, दुर्गामय, कृष्णमय, हनुमानमय, राममय होऊन गेले.
विशेष करून गुढीपाडवा, गणेशचतुर्थी, नवरात्री, संक्रांती, शिवजयंती, होळी-रंगपंचमी सणांचा आनंद या कॉकटेल नृत्यगीताने महाराष्ट्रतील सण, उत्सवाचे दर्शन घडविले. विद्यार्थ्यांनी तबला, हार्मोनियम, पियानो, ताल ही वाद्ये वाजवून कला कौशल्य सादर केले. विद्यार्थी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. विविध सामाजिक, धार्मिक, भाषिक, सांस्कृतिक विषयावर सादर केलेले नाट्यप्रयोग, नृत्यगीते डोळ्याचे पारणे फेडणारी होती. प्रत्येक भाग सुरू होण्यापूर्वी छोट्या विद्यार्थ्यांनी केलेले सूत्रसंचलन हे नेतृत्व गुण करण्याची एक नवी शिकवण देऊन गेली. मान्यवरांनी स्नेहसंमेलनात कला, शैक्षणिक, सांस्कृतिक प्रगती केलेल्या विद्यार्थ्यांचा आणि सामूहिक नृत्य प्रकारात सहभाग घेतलेल्या आई बाबांचा सत्कार केला. नृत्य, पथनाट्य, नाटके सुरू असताना पडद्यावर लावण्यात आलेले स्क्रीन, वेळोवेळी बदलत असणारे ग्राफिक्सने एखाद्या चित्रपटातील दृष्याचा अनुभव दिला.
कार्यक्रमाचे फेसबुक लाईव्हव्दारे प्रेक्षेपण करण्यात आले होते. याद्वारे प्रेक्षकांनी घरबसल्या कार्यक्रमाचा आनंद घेतला. विद्यार्थ्यांनी कलाविष्कारवेळी परिधान केलेल्या वेशभूषा नेत्र सुखावून गेल्या. पालकांनी टाळ्यांच्या गजरात विद्यार्थ्यांचे मनोबल उंचावले. इनोव्हेटीव्ह वर्ल्ड स्कूल मुळे विद्यार्थ्यांचे गुण कौशल्य, शैक्षणिक प्रगती अप्रतिम झाल्याचे पालकांनी आमच्या वृत्त वाहिनीशी बोलताना सांगितले.
यावेळी शैक्षणिक सामाजिक क्षेत्रांतील अजित थिटे, विकास साने, सुनिल भोंडवे, निवृत्ती पिंगळे, शामराव देशमुख, प्रशांत पाटील, विजय शिर्के, कैलास पाचरणे आदीसह विद्यार्थ्यांचे आजी-आजोबा, आई-बाबा, बहीण-भाऊ आदी उपस्थित होते.
पुष्पा थेटे, अनुपम श्रीवास्तव यांनी “यात्रा 05” चे निवेदन केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाचे शिस्तबद्ध नियोजन केले. श्री सरस्वती वंदनेने सुरू झालेल्या कार्यक्रमाची सांगता वंदेमातरम गीताने झाली.