पिंपरी : बालमावळ्यांनी जय जिजाऊ – जय शिवराय जसघोष करीत भगवा झेंडा खांद्यावर घेऊन दुपारच्या रणरणत्या उन्हामध्ये तिकोणा सर केला. महादेवाचे दर्शन घेऊन संपूर्ण किल्ला पदभ्रमण करीतच उत्साहामध्ये बालेकिल्ला सर करून भगवा झेंडा फडकावला. निमित्त होते आकुर्डी येथे आयोजित केलेल्या किल्ले बनवा स्पर्धेतील सहभागी बालमावळ्यांना प्रत्यक्ष किल्ला सहल घडविणे होय.
आकुर्डीतील सविता वायकर आणि अशोक वायकर गेली 19 वर्षे किल्ले बनवा स्पर्धा आयोजित करीत आहेत. स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना घेऊन प्रतिवर्षी नवीन किल्ल्यांची सफर घडवून आगळा वेगळा उपक्रम सातत्याने राबवित आहेत. इतिहासाची आणि स्पर्धेची आवड स्पर्धकांमध्ये निर्माण होऊन प्रत्यक्ष प्रतिवर्षी नवीन किल्ल्याची सफर घडवून किल्ल्यावर स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ करण्याची संकल्पना गेली 19 वर्षे राबविण्यात येत आहे. प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी बालमावळ्यांना तिकोणाची सफर घडवून आणण्यात आली.
सकाळी 7 वाजता आकुर्डीतील श्री विठ्ठल मंदिरापासून दोन बसमधून बालमावळ्यांनी तिकोणाच्या दिशेने प्रस्थान केले. प्रचंड उत्साह, जोश तसेच बाल मावळ्यांच्या मार्गदर्शनासाठी अनुभवी मार्गदर्शक व कार्यकर्त्यांच्या पथकासह सर्वजण दुपारी तिकोणाच्या पायथ्याशी पोहोचले. अल्पोपहार आटपून तात्काळ बाल मावळ्यांनी मुख्य पायऱ्याच्या मार्गाने किल्ला सर करण्यास सुरूवात केली. असह्य उकाडा व भर दुपारची मध्यान वेळेची पर्वा न करता बालमावळ्यांचा जोश, उत्साह अवर्णनीय असा होता. मुख्य किल्ल्यावर आल्यानंतर तळे व किल्ल्याची परिसराची संपूर्ण पायपीट करून मावळ्यांनी उत्सुकतेने माहिती जाणून घेतली. किल्ला पाहिल्यानंतर भगवा झेंडा उत्साहाने फडकवला. यावेळी किल्ले बनवा स्पर्धेतील विजेत्यांचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात पार पडला. बक्षीस वितरण शुभहस्ते माजी नगरसेविका सौ.सविता वायकर, इतिहासाचे अभ्यासक प्रा. नामदेवराव जाधव, पत्रकार ज्ञानेश्वर ठाकर, दूर्गप्रेमी वसंत ठोंबरे, ज्येष्ठ नागरीक ज्ञानेश्वर ननावरे, वसंत सोनार, सुदाम मोरे, दत्तात्रय बोडके, अॅड. काजल वायकर, शिवाजी निंबाळकर, माणिक पवार आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये अनुक्रमे अक्षय राजपूत व सत्यम गुप्ता यांना प्रथम क्रमांक विभागून, प्रथमेश हांडे – द्वितीय क्रमांक, मनिष चिखले व दर्शन छाजेड यांना तृतीय क्रमांक, जितेंद्र पवार – चतुर्थ व सुशांत फापाळे यांनी पाचवा क्रमांक मिळविला. उत्तेजनार्थ प्रणव सावंत, गौरी बोदरा, अथर्व भंडालकर, स्पंदन बोडके, सर्वेश चापेकर, अथर्व पोतदार, भिमांशू साळवे यांनी मिळविले. या सर्वांना ट्रॉफी देवून गौरविण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण ओंकार बिद्रेवाडी, राजाराम आयवळे, मंगेश डाखवे यांनी केले. सहभागी सर्व स्पर्धेकांना नामदेवराव जाधव यांचे वाचनाचे फायदे पुस्तक भेट देण्यात आले.
नितीन कदम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. किरण डाखवे यांनी सूत्रसंचालन केले. संदेश माने यांनी आभार मानले. वसंत ठोंबरे यांनी किल्ल्याची ऐतिहासिक माहिती दिली. बालशाहीर शिवम भूतकर, प्रथमेश हांडे, ऋतिक साळुंके यांनी पोवाडे गोऊन बाल मावळ्यांचा उत्साह द्विगुणित केला.
प्रविण कदम, अमर कांबळे, शुभम वायकर, आकाश फडतरे, सुनिल पिंपळे, अनुप कदम, अंकुश गुप्ता, किरण जंगम, निखील गुप्ता, आकाश काळभोर, आकाश अहिरे आदींनी कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले. स्पर्धेमध्ये 114 स्पर्धक सहभागी झाले होते.
बक्षीस समारंभानंतर बालमावळ्यांनी एकमेकांना आधार देत किल्ला उतरण्यास सुरूवात केली. येताना हडशी येथील विठ्ठल मंदीर पाहून, पवना धरणाचे विहंगम दृश्य डोळ्यात साठवित संध्याकाळच्या सुमारास बालमावळे किल्ल्याची सफर यशस्वी करून आकुर्डीत परतले.