नाशिक – पदवीधर निवडणुकीत आज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस असून डॉ. सुधीर तांबे यांच्यासह चार उमेदवारांनी माघारी घेतली आहे. मात्र माघारीचा दिवस संपला नसल्याने नाशिक पदवीधर निवडणुकीचे चित्र अद्याप अस्पष्ट असल्याचे राजकीय वर्तुळातून बोलले जात आहे.
नाशिक पदवीधर निवडणुकीत पहिल्या दिवसापासून राजकीय घडामोड पाहायला मिळत आहे. आज माघारीचा दिवस असून आतापर्यंत चार उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतल्याचे समोर आले आहे. यात डॉ सुधीर सुरेश तांबे यांची निवडणुकीतून माघार घेतली आहे. डॉ सुधीर सुरेश तांबे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता. याचबरोबर अपक्ष उमेदवार अमोल खाडे, हिंदुस्थान जनता पार्टीचे दादासाहेब हिरामण पवार आणि धनंजय जाधव यांनी देखील माघार घेतली आहे. त्यामुळे नाशिक पदवीधर निवडणूक रिंगणात 18 उमेदवार आहेत. मात्र अद्याप माघारीचा दिवस शिल्लक असल्याने आणखी काय चित्र पालटते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. नाशिकची पदवीधर मतदारसंघाची निवडणूक दिवसेंदिवस अधिक रंगतदार होत आहे.