पिंपरी (दि. 04 जानेवारी 2016) भारताला विश्वगुरु करण्याचा आमचा मानस आहे. शाकाहारी जीवन पध्दतीतूनच आपला सर्वांगिण विकास होवू शकतो. त्याचाच एक भाग म्हणून शाकाहाराचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी कार्यक्रम हाती घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशात तसेच राज्यात दारूबंदी करावी असे आवाहन उज्जैन येथील बाबा जयगुरुदेव आश्रमाचे प्रमुख परम् पुज्य बाबा जयगुरुदेवजी महाराज यांचे आध्यात्मिक उत्तराधिकारी बाबा उमाकान्त महाराज यांची चिंचवड येथे बुधवारी केले.
उमाकांत महाराज यांचे अध्यात्मिक प्रवचन मंगळवारी (दि. 03 जानेवारी) येरवडा कारागृहातील बंधकांसाठी आयोजित करण्यात आले होते. जीवनामध्ये शाकाहाराचा अवलंब करावा, यासाठी बाबा जयगुरुदेव आश्रमाच्या माध्यमातून सुरू असलेल्या कार्याची माहिती उमाकांत महाराज यांनी पत्रकार परिषदेत दिली.
उमाकांत महाराज म्हणाले की, कोणत्याही धर्मातील संत, महात्मे, फकीर यांनी समाजातील सहिष्णूता, बंधुभाव, मानवाप्रती प्रेम, आदर राखला जावा अशाच प्रकारचा संदेश दिलेला आहे. संतांनी दिलेल्या वचनांचे पालन करून जो व्यक्ती त्याचा अंगीकार करतो त्याला मोक्षप्राप्ती होते. मांसाहार करून या सुंदर शरीराला खराब करू नका, मंदिरासमान शरिराची तंदुरूस्ती राखण्यासाठी शाकाहार हाच उत्तम आहार आहे. बिहार राज्यात मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दारूबंदी केली आहे. त्याचे चांगले परिणाम दिसून येत आहेत. गुन्ह्यांचे प्रमाण जवळपास पन्नास टक्क्यांनी कमी झाले आहे. समाजातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी या चांगल्या निर्णयाचे अनुकरण इतर राज्यांनी करावे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभर दारूबंदी आणि गोवंश हत्याबंदी करावी असेही आवाहन उमाकांत महाराज यांनी यावेळी केले.
मन, बुध्दी, चित्त, अंत:करण, आत्मा साफ करण्यासाठी डोळे आणि कान साफ असावे लागतात. शरीराच्या पंचइंद्रियांवर ताबा मिळविण्यासाठी मनाची एकाग्रता आवश्यक आहे. चित्त एकाग्र होण्यासाठी साधनेची आवश्यकता आहे. मोक्षमार्ग संत महात्मे दाखवतात. या मार्गाचे सर्वांनी आचरण केल्यास सशक्त व सुसंस्कृत पिढी निर्माण होईल. तेच पुढे राष्ट्र निर्माणाचे कार्य करतील. त्यासाठी सर्व पालकांनी शाकाहाराचे पालन करावे, देशभक्तीची मुल्यं आपल्या पाल्यांमध्ये रुजवण्यासाठी प्रयत्न करावेत. एकत्रित कुटूंबपध्दतीमुळे जसा कुटूंबाचा विकास होतो. त्याप्रमाणे देशाचा देखील विकास होईल. भ्रष्ट मार्गाने आलेली धनसंपत्ती अनेक संकटे बरोबर घेऊन येते. कष्टाने मिळालेला पैसा दिर्घकाळ टिकतो आणि समाधान मिळते. चारित्र्यवान युवा पिढीच्या निर्माणासाठी माता, पिता आणि गुरुजनांनी युवकांना शाकाहाराचे, निर्व्यसनीपणाचे व दानधर्माचे महत्व सांगावे. सर्वांनी आपल्या उत्पन्नातील काही हिस्सा दिन, दुबळे आणि धर्मकार्यासाठी व राष्ट्रनिर्माणासाठी दान करावा. असा आशावाद परम् पुज्य बाबा जयगुरुदेवजी महाराज यांचे आध्यात्मिक उत्तराधिकारी बाबा उमाकान्त महाराज यांनी व्यक्त केला.
तत्पूर्वी सकाळी पिंपरी चिंचवड, पुणे शहरातील अनुयायांसाठी सत्संग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.