पिंपरी (दि. 06 जानेवारी 2017) आदित्य बिर्ला आणि सहारा उद्योग समुहाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री असताना 2012 मध्ये भ्रष्ट मार्गाने काही कोटी रुपये घेतल्याचे दिल्लीत आयकर विभागाने टाकलेल्या धाडीत सिध्द होत आहे. या बाबत केंद्र सरकारने अद्यापपर्यंत कारवाई केली नाही. सामान्य जनतेचे व माध्यमांचे या विषयावरुन लक्ष विचलीत करण्यासाठीच पंतप्रधानांनी पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटाबदलीचा निर्णय 125 कोटी जनतेवर अन्यायकारकरित्या लादला आहे. हा निर्णय भाजपाच्या पदाधिका-यांना अगोदरच माहिती असल्याने नोटबंदी करण्याच्या अगोदरच्या तीन महिन्यांचा कालावधीत बिहार, ओरीसा मधील भाजपाच्या पदाधिका-यांच्या आणि पक्षाच्या खात्यांवर हजारो कोटींची रक्कम रुपये पाचशे, हजारांच्या नोटांच्या स्वरुपात जमा झाल्या असल्याची माहिती पूर्ण आकडेवारीसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाठविलेल्या पत्रात नमुद करण्यात आली आहे. या सर्व घटनाक्रमांची चौकशी केंद्रीय स्तरावरील स्वतंत्र कमिटी मार्फत केली जावी. या मागणीसाठी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने शहराध्यक्ष सचिन साठे यांच्या नेतृत्वाखाली आकुर्डी प्राधिकरणातील तहसीलदार कचेरीसमोर निदर्शने करण्यात आली. नंतर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात मागणी करण्यात आली की, सहारा उद्योग समूहाच्या डायरी आणि लॅपटॉप मधिल नोंदीनुसार ‘मोदीजी’ यांच्या नावे 40 कोटी रुपयांहून जास्त रक्कम दिल्याचे दिसत आहे. या नोटाबंदीनंतर आयकर विभागाने टाकलेल्या धाडीमध्ये जी नावे पुढे येत आहेत यात सर्व भाजपाचेच मंत्री, पदाधिकारी आहेत. यांच्याकडे 2000 रुपयांच्या नोटांच्या स्वरुपात एवढ्या मोठ्या रकमा कोठून आल्या ? गुजरात मधील महेश शहा यांनी तेरा हजार आठशे साठ कोटी रुपयांची अघोषित संपती जाहिर केली ती नक्की कोणाची आहे ? महाराष्ट्रातील सहकार मंत्री आणि ग्रामविकास मंत्र्यांकडे सापडलेल्या नोटांबाबत चौकशी का केली नाही ? नोटा बदलीच्या गर्दी गोंधळामुळे 115 निष्पाप व्यक्तींचे बळी गेले याला जबाबदार कोण ? जिल्हा बँकाना चलन बदली करण्यास मनाई केल्यामुळे शेतक-यांचे आणि ग्रामिण भागातील छोट्या उद्योग व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान झाले. रब्बी पिकाच्या उत्पन्नावर त्याचा परिणाम झाला त्याला जबाबदार कोण ? या सर्व घटनाक्रमांची चौकशी केंद्रीय स्तरावरील स्वतंत्र कमिटी मार्फत केली जावी. अशी मागणी अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीच्या वतीने या पत्रात करण्यात आली आहे.