पिंपरी (21 जानेवारी 2017) : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर शकुंतला धराडे यांनी शुक्रवारी (दि.20) माझ्या विरूद्ध पत्रकार परिषद घेऊन जे निवेदन प्रसिद्धीस दिले ते त्यांना बोलवित्या धनीने लिहून दिलेले त्यांनी छान वाचले. ज्यांनी महापौरांना लिहून दिले आणि बोलायला लावले त्यांनीच महापौरपदाच्या अडीच वर्षाच्या काळात सभागृहात व सभागृहाबाहेर काम करताना किती त्रास दिला याचा विसर महापौरांना पडला असेल मात्र जनता अद्याप विसरली नाही. शहराच्या प्रथम नागरिकपदाचा ज्यांनी सन्मान राखला नाही त्यांचीच बाजू घेऊन महापौर माझी माहिती न घेता माझ्यावर बिनबुडाचे आरोप करत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या नेत्यांची पळता भुई थोडी झाली असून महिला कार्यकर्त्यांचा वापर करून त्यांना बोलावे लागते. यापेक्षा मोठे दुदैव ते काय? असा प्रश्न राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस कमिटीच्या राष्ट्रीय सरचिटणीस भारती चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.
गुरुवारी पत्रकार परिषदेत भारती चव्हाण यांनी ‘‘ दादा आता तरी दादागिरी थांबवा’’ हे पत्रक प्रसिद्धीस देऊन राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या कार्यशैलीवर तीव्र शब्दात टिका केली होती. त्याला शुक्रवारी महापौर शकुंतला धराडे यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले होते. मागील दोन दिवसात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत असताना भारती चव्हाण यांनी आज पुन्हा पत्रक प्रसिद्धीस देऊन वाद मिटला नसल्याचे दाखवून दिले आहे. महापौर धराडे यांनी ‘मी निवडून आले नाही’ अशी टिका केली आहे. याला चव्हाण यांनी प्रत्युत्तर देताना महापौर धराडे यांनाच आव्हान दिले आहे. महापौर धराडे यांनी आगामी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस नेत्यांच्या जिवावर पिंपरी चिंचवड शहरातल्या कोणत्याही प्रभागामधून निवडणुकीस उभे राहून अनामत रक्कम वाचवून दाखवावी. तसेच माझे पिंपरी-चिंचवडमधील स्थान आणि प्रतिमा ठरविण्याचा अधिकार त्यांना नसून शहरातील राजकारणात मी माझी प्रतिमा कोणत्याही राजकीय बॅनरशिवाय अनेक सामाजिक आणि भव्य कार्यक्रम यशस्वी घेऊन सिद्ध केली आहे. तसेच या कार्यक्रमात महिला आणि पुरूषांनी हजारोंच्या उपस्थितीने माझ्यावर विश्वास व्यक्त केला आहे, हे पुरेसे आहे, असे पत्र भारती चव्हाण यांनी प्रसिद्धीस दिले आहे.