पिंपरी चिंचवड – सरदार वल्लभभाई पटेल हे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाचे पहिले गृहमंत्री व उपपंतप्रधान झाले. या रूपात त्यांनी पाकिस्तातून आलेल्या आणि पंजाब व दिल्ली येथे राहणार्या निर्वासितांच्या मदतीसाठी खूप काम केले. फाळणीनंतर उफाळलेल्या हिंसाचारानंतर शांतीस्थापनेकरीताही त्यांनी कार्य केले, असे मत पिंपरी चिंचवड महापालिकेचे नगरसेवक नामदेव ढाके यांनी व्यक्त केले. नगरसेवक ढाके यांच्या संपर्क कार्यालयात सरदार वल्लभभाई पटेल यांचा अभिवादन कार्यक्रम पार पडला. त्यावेळी श्री. ढाके बोलत होते. यावेळी, वसंत नारखेडे, रविंद्र ढाके, राजेंद्र पवार, सचिन वाणी, प्रमोद चौधरी, सुभाष महाजन आदी उपस्थित होते.
नगरसेवक ढाके पुढे म्हणाले की, सरदारांनी भारताततील 565 अर्धस्वायत्त संस्थानांचे भारतात विलिनीकरण करवून घेणे हे पटेलांचे सर्वात मोठे कार्य होय. मुत्सद्देगिरी व वेळ पडल्यास सैन्यबळ वापरून सरदारांनी संस्थाने भारतात विलीन केली आणि म्हणूनच ते भारताचे लोहपुरुष म्हणून ओळखले जातात. सरदार पटेल हे मुक्त व्यापार व खासगी मालकी हक्कांचे समर्थक होते. भारत छोडो आंदोलनात ते आघाडीवर होते. स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान व गृहमंत्री लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांची आज 144वी जयंती! आजचा दिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणूनही साजरा करण्यात येतो.
गुजरातमधील केवाडिया येथे सरदार सरोवरावर पटेलांचा सर्वात मोठा पुतळा बांधण्यात आला आहे. एकतेचे प्रतिक म्हणून निर्माण केलेल्या या पुतळ्यास ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ असे म्हणतात. त्यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीमिनित्त देशभरात एकता दौडेचे आयोजन करण्यात येते. सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरदार सरोवर येथील त्यांच्या भव्यदिव्य मूर्तीचे दर्शन घेतले. आज पहाटे त्यांनी सरदार पटेलांच्या या स्मारकाला भेट दिली व फुले वाहून अभिवादन केले.